सोमवारी सोशल मीडियावर दोन चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यामधील एक चित्रपट म्हणजे सलमान खान, कतरिना कैफ, तब्बू, सुनील ग्रोवर, दिशा पटानी, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘भारत’ आणि दुसरा अर्जुन कपूर, अमृता पुरी यांचा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड.’ दोन्ही चित्रपटांचे पोस्टर एकाच वेळी प्रदर्शित झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचे वादळच उभे राहिले आहे. सलमान आणि अर्जुनच्या चाहत्यांमध्ये जणूकाही शीतयुद्धच सुरू झाले होते.

सलमानच्या अनेक चाहत्यांनी अर्जुन कपूरला ट्रोल करण्यास सुरूवात केली. या ट्रोलर्सनी अर्जुनला ना ना परीचे प्रश्न विचारत भंडावून सोडले. काही ट्रोलर्सनी तर चक्क ‘सलमानशी पंगा घेतलास, आता करिअरला धोका’ असे लिहून अर्जुनला ट्रोल केले. तर अनेकांनी ‘भाई तू सावधान इंडियामध्ये काम कर’ असे लिहून नव्या कामाचा उपरोधिक सल्ला दिला. चाहत्यांचे हे ट्विट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

सलमान खानचा बहुचर्चित ‘भारत’ हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बस जफरचे असणार आहे. अर्जुन कपूरचा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ हा चित्रपट २४ मे रोजी चित्रपट गृहांमध्ये  प्रदर्शित होणार आहे.