कथा- एका तरुण आयपीएस ऑफिसरची बदली उत्तर प्रदेशातील एका गावात होते. या गावात पगारात तीन रुपयांची वाढ मागणाऱ्या दलित मुलींची हत्या होते. हत्येनंतर दोन मुलींचा मृतदेह सापडतो. या हत्यांमागे जबाबदार कोण, हे शोधण्यात चित्रपटाचे कथानक फिरते. दरम्यान समाजातील जातीचे राजकारण समोर येते. रिव्ह्यू- प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देणाऱ्या आयुषमान खुरानाने 'आर्टिकल १५' या चित्रपटात अयान रंजन या आयपीएस आधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आयुषमानची बदली ही उत्तर प्रदेशातील लाल गाव येथे होते. या गावात जातिवाद आणि गुंडगिरी सर्रास पाहायला मिळते. पगारात तीन रुपयांची वाढ मागणाऱ्या तीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर येते. काही दिवसांनंतर त्या तीन मुलींपैकी दोन मुलींचे मृत्यदेह आढळतात आणि त्यातील एक मुलगी बेपत्ता असते. संपूर्ण ताकदीनिशी आयुषमान बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेतो. या दरम्यान त्याला समाजातील जातीभेदाला सामोरे जावे लागते. त्यावर आयुषमान संविधानातील 'आर्टिकल १५'ने दिलेल्या सर्वधर्मसमभावाचा नारा देतो. एकीकडे आयुषमान त्या मुलीला शोधण्यात त्याची संपूर्ण ताकद एकवटून प्रयत्न करतो तर दुसरीकडे कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापासून ते अगदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत भ्रष्ट झालेले अधिकारी आरोपीच्या बाजून उभे असल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत त्या मुलीला आयपीएस ऑफिसर आयुषमान खुराना वाचवतो की नाही हे पाहण्यासाठी चित्रपट पाहणे गरजेचे आहे. ‘फर्क बहुत कर लिया, अब फर्क लाएंगे’ अशी टॅगलाईन असणाऱ्या 'आर्टिकल १५' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवले आहे. आयुषमान खुराना, ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांचा अभिनय दमदार आहे. एकंदरीत कथा, दिग्दर्शन, संकलन, अभिनय, संगीत आणि छायांकन या सर्वच बाबतीत हा चित्रपट उत्तम ठरतो.