स्वप्निल घंगाळे

लहानपणी आपण सगळ्यांनी एक ‘लांडगा आला रे आला..’ ही गोष्ट ऐकली असेल. एक मेंढपाळ मुलगा लांडगा आल्याची बतावणी करून संपूर्ण गाव गोळा करतो आणि लोकांची फजिती करतो. असं अनेकदा तो करतो, पण खरंच लांडगा येतो तेव्हा गाववाले त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि लांडगा त्यांच्या सगळ्या शेळ्या-मेंढय़ा खातो. ही गोष्ट अचानक आठवण्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमातून अनेक सेलिब्रिटीज्नी चाहत्यांची दिशाभूल करत आगामी चित्रपट, वेबसीरीज, मालिका आणि नाटकांचे प्रमोशन सुरू केले आहे..

एखाद्या खाजगी गोष्टीबद्दल खोटं बोलून त्याचा फायदा आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी क रून घेणे हे बॉलीवूडसाठी काही नवीन राहिलेले नाही. मागील काही वर्षांत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे मुद्दाम भासवल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशातच आता हे वारे मराठी इंडस्ट्रीमध्येही आले आहे. आजपर्यंत खोटं बोलून किंवा प्रेक्षकांची आणि चाहत्यांची दिशाभूल करून प्रसिद्धी करण्याचे फंडे हे केवळ चित्रपटांपुरते आणि त्यातही हिंदी चित्रपटांपुरतेच मर्यादित होते. मात्र हे पेव आता हळूहळू मराठीमध्येही फुटले आहे. याची दोन ताजी उदाहरणे मागील दोन आठवडय़ांमध्ये समाजमाध्यमांवर दिसून आली.

सई ताम्हणकरच्या नवीन वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका चाहत्याचे कलाकारावर असलेले प्रेम कसे घातक ठरू शकते या विषयावर आधारित ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजची सई अनेक दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसिद्धी करत होती. अचानक एक दिवस तिने आपला भ्रमणध्वनी हरवला असून आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवरून येणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करा असं ट्विट केलं होतं. तसेच काही स्क्रीनशॉट्सही तिने पोस्ट केले होते. त्यानंतर तिने ट्विटवरून आणखीन काही व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून हे सर्व ती व्यक्ती ई-मेलवर पाठवत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले. साडेबाराच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार साडेपाचला सईने आपला हरवलेला भ्रमणध्वनी ज्या ठिकाणी तिचं चित्रीकरण सुरू होतं त्या स्टुडिओच्या वॉचमनकडे कोणीतरी देऊन गेले, असं सांगणारा व्हिडीओ पोस्ट करून संपवला.

सईने भ्रमणध्वनी हरवल्याचा बहाणा केला की हाही प्रसिद्धीचाच फंडा होता याबद्दल तिने स्पष्टपणे ट्विटवरून काहीही सांगितले नाही तरी नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. त्यांनी हा प्रसिद्धीचाच फंडा होता, अशी भूमिका घेत तसं तिच्या ट्विटखाली प्रतिक्रिया लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘सम वन इज वॉचिंग’ म्हणजेच कोणीतरी तुमच्यावर नजर ठेऊन आहे अशा आशयाच्या ‘डेट विथ सई’ या वेबसीरिजसाठीचा हा तिचा अनोखा फंडा होता असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सईच्या या नवीन वेबसीरिजमध्ये सईचा एक चाहता कशा प्रकारे तिच्यावर सतत नजर ठेवतो आणि तिला कानोकान खबर न लागता कशा प्रकारे तिच्यावर चित्रपट निर्मिती करतो याबद्दलचे कथानक आहे. आता या वेबसीरिजचे कथानक आणि घडलेला प्रकार बराचसा मिळताजुळता असल्याने सईचा भ्रमणध्वनी हरवणे, तो हरवल्यानंतर सापडलेल्या माणसाने तिला ई-मेलवर स्क्रीनशॉट्स पाठवणे मग तोच भ्रमणध्वनी सहा तासांनी तिला परत मिळणे हा योगायोग नाही हे सहज कळून येते. पुढे बरेच दिवस या प्रकरणाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू राहिली. सध्या ही सईची वेबसीरिज झी ५ वर सुरू आहे.

२१ नोव्हेंबरला सईच्या भ्रमणध्वनी हरवण्याच्या प्रकारानंतर २९ नोव्हेंबरला पुन्हा असाच प्रकार घडला, मात्र या वेळेस प्रेक्षकांना ‘गोड बातमी’ देणारी जोडी होती प्रिया बापट आणि उमेश कामत. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं जोडपं असलेल्या प्रिया-उमेशबद्दल कायमच प्रेक्षकांना आपलेपणा वाटत आला आहे. त्यातच प्रियाने ‘इन्स्टाग्राम’वरून दोघांच्या मिठी मारतानाच्या छायाचित्राला ‘एक गुड न्यूज आहे’ अशी ओळ देऊ न ‘फिलिंग ब्लेस्ड’ हा हॅशटॅग वापरत एक पोस्ट केली. त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांनी आणि संकेतस्थळांनी या जोडप्याला बाळ होणार आहे अशा आशयाचा बातम्या चालवल्या. नेटक ऱ्यांनीही प्रियाच्या या पोस्टवर कमेन्ट करून शुभेच्छा दिल्या. पण चार दिवस या बातम्या चालवल्यानंतर प्रियाने ‘इन्स्टाग्राम’वरून आपल्या आगामी नाटकाचे पोस्टर पोस्ट करत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आणि हीच ती ‘गूड न्यूज’ असल्याचे जाहीर केले. नाटकाचे नाव आणि कथानक हे गरोदरपणाशी संबंधित असल्याने आणि प्रिया निर्माती तर उमेश यात प्रमुख अभिनेता असल्याने या दोघांनी ही ‘गुड न्यूज’ अशा पद्धतीने शेअर केली. बऱ्याच नेटकऱ्यांनी दोघांना शुभेच्छा देत खरी ‘गुड न्यूज’ लवकर द्या असं सांगितलं तर काहींनी अशा प्रकारच्या प्रसिद्धीवर नाराजी व्यक्त केली. बरं या नाटकाची प्रसिद्धी वेगळ्या पद्धतीने व्हावी यासाठी आधीच मुंबई पुण्यामध्ये ‘दादा मी प्रेग्नंट आहे..’ अशा संदेशाचे निनावी होìडगही लावण्यात आले होते. मराठीमधील ही दोन उदाहरणे वगळता ‘अल्ट बालाजी’ या आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपहरणासंदर्भातील नवीन मालिकेच्या ट्रेलर प्रदर्शनानिमित्त निर्माती एकता कपूरनेही ‘इन्स्टाग्राम’वर अशाच प्रकारे अपहरणासंदर्भात गोंधळात टाकणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. अशीच दिशाभूल करणारी प्रसिद्धी अभिनेत्री मुक्ता बर्वेनेही केली होती. ‘रुद्रम’ या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी तिने ‘फेसबुक’वर आपल्या जिवाला धोका आहे वगैरे सांगतानाचा एका अंधाऱ्या खोलीतला व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावेळी मुक्ताच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांवर तिला खरोखरच काळजीचा सल्लाही दिला होता. प्रिया आणि उमेशप्रमाणे ‘मुरांबा’ चित्रपटाच्या वेळेही अमेय वाघने व्हॅलेंटाइनसंदर्भात पोस्ट केली होती. त्यावेळी अविवाहित असणाऱ्या अमेयच्या या पोस्टमुळे त्याची ती कोण यासंदर्भात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. नंतर ती पोस्ट म्हणजे ‘मुरांबा’ सिनेमाची प्रसिद्धी असल्याचे लक्षात आले.

या सगळ्या घटनांमधून एकच गोष्ट ठळकपणे जाणवतेय ती म्हणजे प्रसिद्धीचा फंडा हा थेट आता कलाकारांच्या खाजगी आयुष्याशी जोडला जात आहे. अनेकदा घाबरवून किंवा चांगल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांची दिशाभूल करून एका अर्थाने त्यांच्या भावनांशी खेळत प्रसिद्धी करण्याचा नवा कल सुरू झाला आहे. त्यामुळे भविष्यात अशा अनेक पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील अशी शक्यता नाकारता येत नाही. पण कलाकारांनीही प्रसिद्धी करताना आपले खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवत चाहत्यांच्या जिवाला घोर लावू नये अशी अपेक्षा चाहत्यांनी केली तर त्याच चुकीचं असं काहीच नाही. अशा प्रकारे जरा हटके प्रसिद्धी केली तर त्यात काय बिघडलं? असं म्हणणारेही बरेच असतील, मात्र असं वारंवार होतं राहिलं तर सेलिब्रिटी आपली विश्वासार्हता गमावतील. त्यांचीही अवस्था लांडगा आला रे आला.. अशी होऊ नये.  म्हणून केवळ प्रसिद्धीसाठी कलाकारांनी आपल्या प्रेक्षकांच्या भावनांबरोबर किती खेळायचं हे ज्याचं त्यांनं ठरवायला हवं.