रांगडा, पैलवान गडी, देखणा, भोळा पण प्रेमळते तुमच्या-आमच्या घरातील एखादा तरुण मुलगा वाटावा असे ‘नायक’ आपण मराठी रुपेरी पडद्यावर पाहिले. पण मराठी नायक हा मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहिला. त्याला राष्ट्रीय स्तरावर लोकमान्यता आणि लोकप्रियता मिळाली नाही. कमल हसन, रजनीकांत आदी प्रादेशिक चित्रपटांचे ‘नायक’ संपूर्ण देशभरात ‘हिरो’ होतात किंवा बॉलीवूडमध्ये एखाद्या नायकाच्या नावावर चित्रपट विकला जातो तसे भाग्य मराठी नायकाच्या अद्याप वाटय़ाला आलेले नाही.. रुपेरी पडद्यावर ‘नायक’ म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे देखणा चेहरा, पीळदार शरीरयष्टी, उंची, नृत्यकला असलीच पाहिजे आणि त्याला चांगला किंवा बरा अभियनही करता येणे गरजेचे आहे. अर्थात दिसायला चांगले आहेत, पण अभिनयाच्या बाबतीत ‘ठोकळा’ आहेत अशीही मंडळी बॉलीवूडमध्ये ‘नायक’ म्हणून खपून गेली. ज्या अमिताभ बच्चनला हडकुळा व लंबुटांग म्हणून अगोदर नाकारले गेले तोच पुढे ‘बॉलीवूड’चा ‘सुपरस्टार’ झाला. हिंदीतला ‘नायक’ कसाही असला तरी त्याला ‘ग्लॅमर’ मिळाले. त्या नायकाच्या तुलनेत मराठी रुपेरी पडद्यावरील नायकाला फारसे ग्लॅमर मिळाले नाही. मराठी नायक हा नेहमीच तुमच्या-आमच्या घरातील एखादा आपला कोणीतरी वाटत राहिला. हिंदीतील नायकांप्रमाणे मराठीतही रांगडे ते देखणे असे नायक होऊन गेले. अभिनयाच्या बाबतीतही ते नक्कीच उजवे होते. पण मराठी नायक हा मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहिला. त्याला राष्ट्रीय स्तरावर लोकमान्यता आणि लोकप्रियता मिळाली नाही. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे नायक म्हणून असे झाले असेल तर दाक्षिणात्य चित्रपटातील कमल हसन, रजनीकांत यांचे काय? ‘नायक’ म्हणून जी प्रतिमा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात उमटते त्या प्रतिमेत तर हे दोघे अजिबात बसणारे नाहीत. पण तरीही त्यांनी दाक्षिणात्य प्रेक्षकांसह अन्य भाषिक प्रेक्षकांवरही आपली जादू केली. मराठी नायक तरुण, देखणा आहे, अभिनयातही तो उजवा आहे मात्र असे असूनही तो ‘सुपरस्टार’ झाला नाही. मराठी नायक मराठी वर्तुळापुरताच मर्यादित राहिला. दादा कोंडके यांनी प्रेक्षकांवर विशेषत: ग्रामीण भागातील प्रेक्षकांवर गारूड केले. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे यांनी आपला स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला. पण तेही ‘सुपरस्टार’ होऊ शकले नाहीत. मिलिंद गवळी, मकरंद अनासपुरे, नंदू माधव, गिरीश कुलकर्णी हेही ‘हिरो’ म्हणून चमकले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांना लोकप्रियता मिळाली. भरत जाधव मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’ ठरला. मराठी रुपेरी पडद्यावर रंगभूमीच्या तुलनेत नायक म्हणून कमी पडला. अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, सुबोध भावे, स्वप्निल जोशी, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, गश्मीर महाजनी, अनिकेत विश्वासराव, शशांक केतकर, सिद्धार्थ चांदेकर, उमेश कामत आदी तरुण चेहऱ्यांबरोबरच अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, जितेंद्र जोशी, उपेंद्र लिमये आदी अभिनेतेही ‘नायक’ होते आणि आहेत. गेल्या पिढीतील नायकांचा विचार केला तर राजा परांजपे, राजा गोसावी, सूर्यकांत, चंद्रकांत, अरुण सरनाईक, विक्रम गोखले, रवींद्र महाजनी आदी नायकांचाही उल्लेख करता येईल. या सर्व मंडळींनीही एक काळ गाजविला. डॉ. काशिनाथ घाणेकर रंगभूमीवर ‘हाऊसफुल्ल’ सम्राट होते पण रुपेरी पडद्यावर ‘नायक’ म्हणून रंगभूमीच्या तुलनेत यशस्वी झाले नाहीत. नाना पाटेकर यांना हिंदीत वलय आहे. पण ते नायक म्हणून नाही. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील ललित प्रभाकर आता रुपेरी पडद्यावरचा ‘नायक’ झाला आहे. ‘चि.व. चि.सौ.कां.’ हा प्रदर्शित झालेला त्याचा पहिला चित्रपट. त्याचा ‘टीटीएमएम’ (तुझं तू माझं मी) हा दुसरा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ललितच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला नवा, तरुण नायक मिळाला आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतून तरुणाईत विशेषत: मुलींमध्ये लोकप्रिय असलेला अमेय वाघ ‘मुरांबा’च्या रूपाने ‘नायक’ म्हणून रुपेरी पडद्यावर आला आहे. मराठीत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांनी आपली खेळी पडद्यावर सुरू केली आहे. ‘सैराट’मधून आकाश ठोसरने ‘नायक’ म्हणून पदार्पण केले. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘एफयू’मधून तो वेगळ्या ‘लुक’मध्ये समोर आला. पण या चित्रपटात तो पूर्णपणे फसला. याच चित्रपटातील मयूरेश पेम याला नायक म्हणून ‘बोभाटा’मध्ये पाहिले. ‘बालकपालक’, ‘टाइमपास’ चित्रपटांतून प्रथमेश परब नायक म्हणून दिसला. ‘ती सध्या काय करतेय’च्या निमित्ताने अभिनय बेर्डे हा कुमारवयीन चेहरा ‘नायक’ म्हणून समोर आला.हिंदीतील नायकांना ‘नायक’ म्हणून जसा ‘चेहरा’ मिळतो तसा तो मराठीतल्या नायकांना मिळालेला नाही. रुपेरी पडद्यावरील मराठी नायकांच्या तुलनेत दूरचित्रवहिन्यांवरच्या मराठी मालिकांमधील ‘नायक’ अधिक ‘हिट’ ठरले. दररोज आणि घराघरांत पोहोचल्यामुळे त्यांना ते नायकपण मिळाले असावे. बॉलीवूडमधील ‘खान’दान किंवा अक्षयकुमार आणि अन्य नायकांचा चित्रपट येणार असला की त्याची ज्या प्रमाणात प्रसिद्धी होते, काहीतरी वाद निर्माण केला जातो, चर्चा होते तसे मराठीतल्या नायकांबाबत कधी होत नाही. नकारात्मक नको पण सकारात्मक तरी जोरदार प्रसिद्धी किंवा चर्चा झाल्याचे फारसे दिसत नाही. हिंदीतील नायकांप्रमाणे मराठी चित्रपटांच्या नायकांचे कपडे, केशरचना याची ‘फॅशन’ झाली किंवा तरुणाईने त्यांचे अनुकरण केले असेही अपवाद वगळता होत नाही. गेल्या काही वर्षांत सामाजिक माध्यमांचा वापर, प्रसिद्धी आणि विपणनाचे नवे तंत्र मराठी निर्माते, अभिनेते यांनी अंगीकारायला सुरुवात केली आहे. विविध दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्रे यांना मुलाखती देणे, जाहीर कार्यक्रमात हजर राहणे, ‘फेसबुक’, ‘ट्विटर’चा वापर करणे आदी गोष्टी आजचे काही मराठी नायक करत आहेत. मराठी चित्रपटांचे, नायकांचे ‘प्रमोशन’ वेगळ्या प्रकारे केले जात आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, गाण्यांचे प्रकाशन असे सोहळे भपकेबाज व बॉलीवूडच्या धर्तीवर केले जात आहेत.मात्र असे असले तरीही आपला मराठी नायक कुठेतरी कमी पडत आहे. त्याला अन्य काही कारणांबरोबरच मराठी प्रेक्षकही जबाबदार आहे. आपण मराठी कमी आणि हिंदी चित्रपट जास्त पाहतो. अन्य भाषक प्रेक्षक त्यांच्या भाषेतील नायकांसाठी जसे ‘वेडे’ होतात आणि ‘अतिरेकी’ प्रेम करतात तसे आपण आपल्या मराठी नायकांवर करत नाही. हिंदीतील अनेक नायक किंवा दाक्षिणात्य रजनीकांतप्रमाणे एकटय़ाच्या बळावर चित्रपट खेचून नेईल, मराठी नायकासाठी प्रेक्षक अक्षरश: वेडे होतील, मराठी नायकाचा चित्रपट पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागतील, मराठी नायकाचा चित्रपट नवनवे विक्रम करेल, अशा मराठी नायकाचा ‘चेहरा’ महाराष्ट्रापुरताही पाहायला मिळत नाही. मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकही अशा मराठी नायक आणि त्याच्या ‘चेहऱ्या’च्या शोधात आहेत.