भक्ती परब

‘सैराट’ चित्रपटानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘कागर’ या चित्रपटातून तर ‘रिंगण’, ‘यंग्राड’ चित्रपटानंतर दिग्दर्शक मकरंद माने ‘कागर’ चित्रपटातून गावाकडची राजकीय पार्श्वभूमी असलेला तितकाच जिव्हाळ्याचा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आले आहेत. रिंकू आणि मकरंद हे दोघे राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘कागर’ चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या दोघांशी झालेल्या गप्पा..

नावात काय आहे असे म्हणतात, पण ‘कागर’ नावानेच खूप उत्सुकता वाढली आहे. याविषयी विचारले असता मकरंद माने हसून म्हणाला, चित्रपटाच्या दृष्टिकोनातून ‘कागर’ हा शब्द खूप महत्त्वाचा ठरतो. हा शब्द १५० ते २०० वर्षांपूर्वी खेडेगावात वापरला जायचा. नव्हाळी, पालवी, कोंब असं वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं जातं. कोवळी पालवी म्हणजेच कागर. चित्रपटाला ग्रामीण राजकीय पार्श्वभूमी असून एक स्वप्न पाहणारी मुलगी पहिल्यांदा उंबरठय़ाबाहेर पडते, हा कागर क्षण आहे. शहरातल्या मुलींना उंबरठय़ाबाहेर पडून काम करणं सोपं असतं, पण गावाकडे ती स्थिती अजूनही बदललेली नाही आहे. गावाकडेही स्वातंत्र्य असलेतरी तिथे वेगळ्या प्रकारची बंधनं आहेत. त्याला राजकीय, सामाजिक संदर्भ लागू होतात. गावामध्ये कुठलीही वेगळी गोष्ट करायची असल्यास राजकीय, सामाजिक बंधनं पटकन झुगारता येत नाहीत. कारण आपल्या रोजच्या जगण्याशी ते निगडित असतं, त्याला बाजूला सारता येत नाही. अशा वातावरणात वेगळं काही करू पाहणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट आहे.

सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे चित्रपटासाठी योग्य पार्श्वभूमी तयार झालीय का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल मकरंदने सांगितले, हो नक्कीच. अगदी योग्य वेळेस चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील राजकीय, सामाजिक वातावरण प्रेक्षकांना जे सांगू पाहतंय, ते प्रेक्षकांना अधिक जवळचं वाटेल, मनाला भिडेल. गोष्ट सांगताना ती प्रेक्षकांना आपलीशी वाटली पाहिजे. रिंकूचं मी ‘सैराट’मधील काम पाहिलं होतं. ती विषय समजून घेऊन काम करते. तिला व्यक्तिरेखेची समज आहे.

रिंकूबद्दल बोलणं सुरू असताना रिंकू तिथे आली. रिंकूला चित्रपटातील ती साकारत असलेल्या ‘राणी’ या भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली, राणीचं युवराजवर खूप जीवापाड प्रेम असून त्याच्या कामात ती त्याला मदत करत असते. संवेदनशील असलेली ही मुलगी ग्रामीण भागातील राजकीय पार्श्वभूमीत वाढलेली असून तिला स्वत:बद्दल खूप आत्मविश्वास आहे. कोणताही निर्णय ती विचारपूर्वक घेते. ‘राणी’च्या भूमिकेला विविध छटा असून तिच्यासमोर आलेल्या परिस्थितीनुसार ती घडत जाते. एका टप्प्यावर तिला घराचा उंबरठा ओलांडावा लागतो. राजकारणात आपल्या नेतृत्वगुणांनी चमकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी तिची गोष्ट प्रेरणादायी ठरेल. ‘आर्ची’च्या भूमिकेनंतर ‘राणी’ करताना दडपण असण्यापेक्षा आव्हान अधिक होतं. ‘राणी’ प्रेक्षकांना आपलीशी वाटली पाहिजे, यासाठी मेहनत घेतली. ही व्यक्तिरेखा साकारताना खूप आनंद झाला. अभिनयाखेरीज मी पुस्तकं वाचणं, स्वयंपाक करणं, रांगोळी, मेंदी किंवा चित्र काढणं, गप्पा मारणे यात मी रमते. मनोरंजनाबरोबरच एखादा सामाजिक विषय किंवा संदेशही चित्रपटातून पोहोचवता आला पाहिजे.

घरात आणि मैत्रिणींशी खूप गप्पा मारायच्या, खायचं-प्यायचं आणि मन लावून अभ्यास करायचा हेच माझं आयुष्य होतं. पण त्यात आता खूप बदल झाला आहे. पदवीपर्यंत शिक्षण घ्यायचं आहे. मला नायिकाप्रधान चित्रपट बघायला खूप आवडतात. अशा चित्रपटांमध्ये काम करायलाही आवडेल. चित्रपटात नेहमी नायिकेला वाचवायला नायकच का येतो? हे पाहून माझी खूप चिडचिड होते. नायिका का नाही नायकाला सोडवत? नायिकेला का नाही धाडसी दाखवलं जात?, असे प्रश्न मला पडतात. अभिनेत्री श्रीदेवी आणि स्मिता पाटील एखादी भूमिका साकारताना चित्रपटात इतर व्यक्तिरेखांपेक्षा आपला स्वत:चा प्रभाव निर्माण करतात. मलाही असे चित्रपट करायचे असल्याचे रिंकूने सांगितले.

पुन्हा मकरंदशी गप्पा सुरू झाल्यावर तो म्हणाला, ललित कला केंद्रात शिकण्यापूर्वी चित्रपट माध्यम मला माहितीच नव्हतं. मी तिथे नाटकाचं शिक्षण घेतलं. तिथे गेल्यावर लेखन, दिग्दर्शन करताना पूर्ण कलाकार म्हणून मी घडलो. तेव्हा सतीश आळेकर सर म्हणाले होते की तुम्ही व्यक्त होणे गरजेचे असून तुमचं व्यक्त होणं माध्यमांमधून झालं पाहिजे. त्यातूनच मला लेखन प्रेरणा मिळाली, मी जे अनुभवलं, मी जसा विचार करतो, तो व्यक्त करायला हवा असं वाटू लागलं, तेव्हा लिहायला लागलो. मी या माध्यमाकडे कसा बघतो तेही महत्त्वाचं आहे. खूप दिवस एखादा विषय माझ्या मनात ठाण मांडून बसला की तो मांडावासा वाटतो. ‘कागर’बद्दल असंच झालं.

चित्रपटातून एखाद्या व्यक्तिरेखेशी आपण भावनिकरीत्या जोडले जातो तीच माध्यमांची खरी ताकद आहे. अलीकडच्या मराठी चित्रपटांविषयी सांगायचं झाल्यास प्रेक्षक आधी ते चित्रपट पाहतात, तो स्वीकारतात मग त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. प्रेक्षकांना एखाद्या चित्रपटाविषयी प्रश्न पडतात, तेव्हा त्यांनी आपापसात चर्चा न करता, चित्रकर्त्यांना ते प्रश्न विचारून त्याची उत्तर मिळवायला हवीत, असंही मकरंदनं सांगितलं.

स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचीही भूमिका साकारायची इच्छा आहे. चित्रपट माध्यमात भविष्यात छायाचित्रण आणि दिग्दर्शन शिकायचे आहे.

रिंकू राजगुरु

प्रस्थापित गोष्टींना छेद देऊ न स्त्रिया वेगळं काही करायचं ठरवतात  तेव्हा संघर्ष निर्माण होतो. राजकारणात येणाऱ्या स्त्रिया त्यांच्या मतांवर किती ठाम आहेत, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.

मकरंद माने