सिनेमा आणि मालिकांमधील विविध भूमिकांमधून अभिनेता स्वप्निल जोशी याने वेगवेगळे प्रयोग केले आहेत. नेहमी नवं काही तरी करू पाहणाऱ्या या अभिनेत्याने आता वेब सीरिजच्या माध्यमातही पदार्पण केले आहे. ‘समांतर’ असे या वेब सीरिजचे नाव असून प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी. निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने के ली आहे. ही वेब सीरिज सुप्रसिद्ध कादंबरीकार सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर बेतलेली असून यात स्वप्निलबरोबर अभिनेत्री तेजस्विनी पंडित मुख्य भूमिके त आहे. ‘एमएक्स प्लेयर’ या अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध असून आतापर्यंत ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या वेब सीरिजला पसंती दिली आहे. यानिमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशी याच्याशी या नव्या माध्यमाच्या अनुभवाविषयी, त्याच्या चित्रपटांविषयी केलेली बातचीत.. सिनेमा, मालिका, रंगभूमी या तिन्ही माध्यमांतून मुशाफिरी के लेल्या स्वप्निलने ओटीटी माध्यमाकडे यायला एवढा वेळ का लागला, असे विचारले असता मला गेली दोन वर्षे वेब सीरिजसाठी विचारणा होत होती, पण सातत्यानं मी त्या नाकारत होतो, असे त्याने सांगितले. त्यामागचे कारण स्पष्ट करताना तो म्हणतो, आजवर ज्या भूमिका मी सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये केल्या, त्याच भूमिका पुन्हा मला वेबवर करायच्या नव्हत्या. वेब सीरिजमध्ये पहिले पाऊल टाकताना कथानकाची निवड माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. सुहास शिरवळकरांच्या लेखणीवर माझा पूर्ण विश्वास आहे. कॉलेजमध्ये असताना मी शिरवळकरांची ‘समांतर’ ही कादंबरी अनेकदा वाचली होती. त्यातल्या कुमार महाजन या पात्राचा शोधप्रवास या वेब सीरिजच्या माध्यमातून सर्वासमोर घेऊन आलो आहे. ‘समांतर’ या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिके विषयी अधिक विस्ताराने सांगताना तो म्हणतो, या वेब सीरिजचा नायक म्हणजेच कुमार महाजन स्वत:च्या भविष्याविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रवासाला निघतो. त्याच्या भविष्याचा आणि सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा नक्की संबंध काय, हे शोधण्याची त्याची धडपड आणि त्याची चित्तथरारक कहाणी ‘समांतर’ या वेब सीरिजमधून उलगडतो. ‘जीसिम्स’ आणि ‘एमएक्स प्लेयर’मुळे पुन्हा एकदा सुहास शिरवळकरांच्या कथेचा नायक साकारता आला, याबद्दलही त्याने आनंद व्यक्त के ला. सुप्रसिद्ध कादंबरीकार सुहास शिरवळकरांनी लिहिलेले पात्र त्याने या वेब सीरिजमधून पुन्हा साकारले आहे. याआधी त्याने शिरवळकरांच्याच ‘दुनियादारी’ या कादंबरीवर आधारित चित्रपटात काम के ले होते आणि हा चित्रपट मराठीतील सुपरहिट चित्रपट ठरला. याबद्दल बोलताना तो म्हणतो, सुहास शिरवळकर माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. ते धाडसी लेखक आहेत. शिरवळकरांच्या लिखित स्वरूपातील साहित्याचे पडद्यावर रूपांतर होण्याची ही तिसरी वेळ आहे. ‘समांतर’मुळे मला पुन्हा एकदा सुहास शिरवळकरांच्या कथेचा नायक साकारता आला आहे. हा नायक आता फक्त मराठीपुरता मर्यादित राहिला नसून वेब सीरिजच्या निमित्ताने तो संपूर्ण जगाचा झाला आहे. याआधीही मी त्यांच्या ‘दुनियादारी’वर आधारित चित्रपटात ‘श्रेयस’ची भूमिका केली होती. त्या वेळी मला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे अविस्मरणीय होतं. आता ‘समांतर’च्या कुमारमुळे ते प्रेम पुन्हा एकदा अनुभवायला मिळतं आहे, असे तो सांगतो. सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी ही कायमच मालिका-चित्रपट माध्यमातली दिग्दर्शक-अभिनेत्याची सुपरहिट जोडी राहिलेली आहे. हीच जोडी आता वेब सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली आहे. नव्या माध्यमातील त्यांच्या या एकत्रित अनुभवाबद्दल बोलताना ही वेब सीरिज आपल्या मनाच्या खूप जवळ आहे, असे स्वप्निल म्हणतो. या वेब सीरिजवर मी व सतीश राजवाडे दोन ते अडीच वर्षे काम करतोय. सतीश हा शिरवळकरांच्या ‘समांतर’ या पुस्तकाने भारावला होता. मला वाटतं की, या प्रकल्पासाठी तोच एक सशक्त दिग्दर्शक होता. सतीश आणि मी खूप वेळा एकत्र काम केले आहे, पण प्रत्येक वेळी मला त्याने केलेल्या कामामध्ये नवीन काही तरी करायला मिळाले आहे. तसेच या वेब सीरिजची निर्मिती करण्यात अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी. निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने मोलाची भूमिका बजावली आहे. वेब सीरिजच्या या पहिल्याच प्रयोगातून सुखावलेला स्वप्निल लवकरच रुपेरी पडद्यावरही एका वेगळ्या भूमिके तून प्रेक्षकांसमोर येईल यात शंका नाही. वेब सीरिजचा एक फायदा असतो तो म्हणजे आपण सत्याच्या जवळ जात गोष्ट सांगू शकतो. सेन्सॉरशिपची तलवार मानेवर नसते. ज्यामुळे आपल्याला वास्तववादी दृश्य पडद्यावर साकारता येते, जे आपल्याला सिनेमा किंवा मालिकांमध्ये करायला मिळतेच असं नाही. जसे आहेत तसे नातेसंबंध आपण वेब सीरिजमध्ये दाखवू शकतो. इतर माध्यमांमध्ये काम करताना त्या मर्यादा येतात. ती चौकट मला मोडायची होती, असे त्याने सांगितले. इतकी वर्षे मनोरंजनविश्वात काम केल्यानंतर मी नवीन काही तरी के लं तरचप्रेक्षक माझं काम बघतील. नाही तर त्यांच्या नजरेत मी एकसुरी काम करणारा नट म्हणूनच राहीन. ते मला नको होते. स्वप्निल जोशी