सोनी मराठी वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केलंय आणि याचे एकमेव कारण म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील मनोरंजक मालिका. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय होतं आहेत आणि प्रत्येक मालिकेत एक नाविन्य, वैशिष्ट्य आहे. त्यापैकी ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि कथा. तीन पिढ्या आणि त्यातील प्रमुख पुरुष मंडळी यांच्या नात्यावर आधारित कथा मांडून सोनी मराठीने एक उत्तम मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. तीन पिढ्या, त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावर याच्या अवती-भवती फिरणारी ‘भेटी लागी जीवा’ची कथा खूप सुंदर पध्दतीने मांडली जात आहे. ही कथा तितक्याच सुंदर पध्दतीने यातील तीन पिढ्यांतील प्रमुख पुरुष पात्र साकारणारे कलाकार अरुण नलावडे (तात्या), समीर धर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग) यांनी पडद्यावर सादर केली आहे. एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरूण नलावडे तात्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रम करणाऱ्या तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱ्या ओव्या आणि त्या ओव्यांभोवती गुंफलेलं तात्यांचं आयुष्य. डिजे-रिमिक्स च्या या काळात गवळण, भारूड, भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणं दुर्मिळचं. मात्र सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने कानी पडणारे हे शब्द प्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडून या एकंदर नाट्याला मिळणारी भारूडाची जोड कौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनच नाही तर अरूण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेले संवाद ही तितक्याच ताकदीचे आहेत. हल्लीच्याच एका भागात, "आशिर्वादाला ओझं समजून परत करायला आले की काय." म्हणणाऱ्या तात्यांचे संवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्या अनुषंगाने सादर होणारं भारूड प्रेक्षकांना आपल्या मुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे. ( आणखी वाचा : #RanveerDeepikaWedding : तारीख ठरली अन् मीम्सची सुपारी फुटली) भारूडाशी जोडलेली तात्यांची पिढी, बिझनेस हेच सर्वस्व समजणारा मध्यमवयीन विकास आणि तारूण्याशी नुकतीच ओळख झालेला तरूण म्हणजे विहंग. मुलगा-वडील-नातू अशी ही तीन पिढी, त्यांच्यातील पुरेसा नसणारा संवाद, भावना यावर आधारितल ‘भेटी लागी जीवा’ मालिकेतील या तिघांच्या नात्यामध्ये पडलेली दरी कशी भरत जाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अरुण नलावडे, समीर धर्माधिकारी आणि श्रेयस राजे यांनी त्यांच्या भूमिका इतक्या चोख पार पाडल्या आहेत की ही कथा जणू आपल्या सभोवताली घडतेय असं वाटून प्रेक्षक मालिकेला मनापासून दाद देत आहेत. आजोबा आणि नातू यांची योगायोगाने झालेली भेट प्रेक्षकांसाठी आनंददायी क्षण असेल पण त्यांच्या नात्याची खरी ओळख त्यांना कधी होईल हे जाणून घेण्यासाठी पण प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. आपल्या वडीलांना भेटवण्यासाठी जेव्हा विहंग तात्यांना घेऊन त्याच्या घरी जाईल तेव्हा काय घडेल अन् कसं घडेल हे ‘भेटी लागी जीवा’च्या पुढील भागांत पाहायला मिळेल. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.