गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल अभिनेत्री आशा नेगी आणि ऋत्विक धनजानी यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. आता आशाने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या ब्रेकअपवर वक्तव्य केले आहे.

नुकतीच आशाने ‘आज तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ब्रेकअपबद्दल वक्तव्य केले आहे. ‘मी फक्त एवढच सांगेन की आम्ही दोघे सध्या जिकडे कुठे आहोत तिकडे स्वत:ला वेळ देत आहोत. माझ्या मनात ऋत्विक विषयी कोणताही राग नाही. मला विश्वास आहे ऋत्विकच्या मनातही तसे नसेल. त्याला आयुष्यात जे काही हवं आहे ते त्याला मिळू देत’ असे आशा म्हणाली.

‘या सर्व माझ्या खासगी गोष्टी आहेत. आम्ही कलाकार असलो तरी माणूसच आहोत. मी चाहत्यांना इतकच सांगू इच्छिते की आमच्या बद्दल कोणतेही मत तयार करु नका. कारण आमचे देखील आयुष्य असते आणि आमच्या आयुष्यात आम्ही घेतलेल्या निर्णयांचा आदर करा’ असे आशा पुढे म्हणाली.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर ऋत्विक आणि आशाची ओळख झाली होती. २०१३मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. तसेच या जोडीने ‘नच बलिये ६’ मध्ये सहभाग घेऊन विजेतेपद मिळवले होते. आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याने चाहते दु:खी झाले आहेत.