विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने अभिनेते अशोक सराफ यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. एका चित्रपटासाठी अवघे ५०० रुपये मानधन घेऊन त्यांनी काम केलं. इंडस्ट्रीतला त्यांचा हा प्रवास सांगताना अशोक मामांनी 'दोन स्पेशल' या कार्यक्रमात एक किस्सा सांगितला. कोल्हापूरला शूटिंगसाठी ट्रेनमधून जाताना घडलेला हा किस्सा अशोक मामांनी सूत्रसंचालक जितेंद्र जोशीला सांगितला. ते म्हणाले, "चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त आम्ही कोल्हापूरला ट्रेनने जात होतो. निर्मात्यांना कशाला त्रास द्यायचा आणि रात्री बसलो की थेट सकाळी कोल्हापूरला उतरायचं म्हणून थ्री टायरमधूनच आम्ही प्रवास करत होतो. माझ्यासमोर दोन जण बसले होते. त्यातला एक व्यक्ती माझ्याकडे सारखा बघत होता आणि दुसरा बघतच नव्हता. माझ्याकडे निरखून बघणाऱ्या व्यक्तीने त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला विचारलं की, तू यांना ओळखलंस का? तो म्हणाला, हो मी केव्हाच ओळखलं, पण मला वाटलं नव्हतं की ते थर्ड क्लासने प्रवास करतील." हे ऐकताच जितेंद्र जोशीलाही आश्चर्याचा धक्का बसला. प्रवाशाने माझ्या तोंडासमोर म्हटलं की, हे थर्ड क्लासने प्रवास करतील असं वाटलं नव्हतं, असं अशोक सराफ सांगत असतानाच त्यांनी इंडस्ट्रीतला कमाईचा प्रवास कसा बदलत गेला हे मार्मिक शब्दांत मांडलं. पाहा व्हिडीओ- "फक्त तीन तासांत मिळालं स्टारडम" "माझा पहिला चित्रपट मी ५०० रुपयांमध्ये केला. पण त्यावेळी एक-एक रुपयाची किंमत जास्त होती. आता लोक करोडोंची भाषा करतात, आम्ही अजून लाखांतच आहोत. ज्यावेळी इंडस्टी लाखांत होती, तेव्हा आम्ही हजारांत तडफडत होतो", असं अशोक मामांनी सांगितलं. हे ऐकल्यावर अशोक मामांनी इंडस्ट्रीत केलेलं काम जरी स्पर्श करायचं म्हटलं किंवा नुसतं बघायचं जरी म्हटलं तरी ते आपल्या हाताबाहेरचं आहे, असे उद्गार जितेंद्र जोशीने काढले.