९० च्या दशकात अनेक अशा मालिका होत्या ज्याचं नाव आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरलेल्या आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘हम पांच’. माथुर दाम्पत्य आणि त्यांच्या पाच मुली यांच्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. आता लॉकडाउनमध्ये हीच मालिका पुन्हा पाहता येणार आहे. 'मिरर ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री विद्या बालनने राधिका माथुरची भूमिका साकारली होती. तिच्याविषयी अशोक सराफ म्हणाले, "विद्या बालनने काही एपिसोड्ससाठी काम केलं होतं. मला अजूनही नीट आठवतंय की तिने जवळपास १०० एपिसोड्स केले." मालिकेच्या लोकप्रियतेमागचं कारण सांगत ते पुढे म्हणाले, "हम पांचची स्क्रिप्ट जबरदस्त होती. इम्तियाज पटेल यांनी प्रत्येक भूमिका अत्यंत बारकाईने लिहिली होती. बिना माथुरची भूमिका साकारणाऱ्या शोमा आनंद यांनी त्यावेळी पहिल्यांदाच कॉमेडी मालिकेत भूमिका साकारली होती. आमचं कुटुंब फार आनंदी होतं. शूटिंग सुरू झाल्यावर आम्हाला वेळेचं भानच नसायचं. पॅकअप झाल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगची वाट पाहायचो." आणखी वाचा : एकता कपूरने 'महाभारत' मालिकेचा सत्यानाश केला; मुकेश खन्नांची टीका पुन्हा अशी मालिका बनवता येणार नाही, असंही ते म्हणाले. "काहींनी मालिका पुन्हा बनवण्याचा निर्णय घेतला. पण तो चुकला. तितक्याच ताकदीची मालिका पुन्हा बनवता येणार नाही. त्यासाठी तेच कलाकार व पटकथालेखक आवश्यक असतील",असं म्हणत सध्याच्या काळात कॉमेडी मालिका फार बघितल्या जात नाहीत अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. १९९५ ते २००६ या कालावधीमध्ये ‘हम पाच’ या मालिकेने प्रेक्षकांच चांगलंच मनोरंजन केलं होतं. या मालिकेमध्ये अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, भैरवी रैचुरा,वंदना पाठक आणि विद्या बालन यांसारखे कलाकार झळकले होते. या साऱ्यांनी आपल्या उत्तम अभिनयामुळे मालिकेची रंगत वाढविली होती.