बॉलिवूडमध्ये आज अनेक कलाकार नावारुपाला आलेले आहेत. त्यांच्या याच नावाजलेपणामुळे त्यांचा हा वारसा त्यांच्या मुलांना मिळाला असून ते देखील बी टाऊनमधील स्टारडम अनुभवत आहेत. आतापर्यंत आपल्याला बॉलिवूडमधील सुपरस्टार, त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या मुलांविषयीची माहिती होती. मात्र याच कलाकारांचे जावईदेखील त्यांच्या इतकेच नावाजलेले असून ते देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मात्र बॉलिवूडमध्ये लोकप्रिय ठरत असलेले हे कलाकार नक्की कोणाचे जावई आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर पुढील नावं नक्कीच वाचायला हवीत –

१. सलीम खान – ‘दिल ने जिसे अपना कहा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री हे बॉलिवूडमध्ये नावजलेल्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांचा जन्म २४ जून १९७० साली एका पंजाबी कुटुंबामध्ये झाला. अतुलने ‘पसंद अपनी अपनी’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर काही चित्रपटामध्ये झळकल्यावर त्याने त्याची वाटचाल दिग्दर्शनाच्या दिशेने केली. दरम्यान अतुल हा लेखक सलीम खान यांचा जावई असून त्याने सलीम यांची मुलगी अलवीरा हिच्याशी १९९६मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना एलिजा आणि अयान ही दोन मुलं आहेत.

२. राजेश खन्ना- डिंपल कपाडिया – एकेकाळी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचा जावईदेखील त्यांच्याप्रमाणेच लोकप्रियतेचं शिखर सर करत आहे. अभिनेता अक्षयकुमार हा राजेश-डिंपल यांचा जावई असून त्याने २००१ मध्ये ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केलं होतं. त्यांना आरव आणि नितारा ही दोन मुलं असून राजेश आणि डिंपलचे ते प्रचंड लाडके असल्याचं सांगण्यात येतं. अक्षय सध्या त्याच्या अगामी ‘केसरी’ आणि ‘गोल्ड’ या चित्रपटांमध्ये व्यस्त असून हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

३. तनुजा- १९८०च्या काळात प्रचंड लोकप्रिय अभेनित्री असलेल्या तनुजाला काजोल आणि तनीषा या दोन मुली असून काजोलचं लग्न प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन याच्याबरोबर झालं आहे. आजच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमध्ये अजयचं नाव आवर्जून घेतलं आहे. अजय सध्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. अजय आणि काजोलने १९९९मध्ये लग्न केलं असून आता त्यांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत.

४. सुनील दत्त – ‘चॉकलेट हिरो’ या नावाने ओळखला जाणारा कुमार गौरव हा अभिनेता सुनील दत्त यांचा जावई असून त्याने १९८४ मध्ये सुनील दत्त यांची मुलगी नम्रता हिच्याबरोबर लग्न केलं. लव स्टोरी या चित्रपटामध्ये कुमार गौरव नावारुपाला आलेला अभिनेता असून त्याच्या अभिनयाची जादू मात्र फार काळ प्रेक्षकांच्या मनावर चालली नाही.

५. रणधीर कपूर- बबिता – बॉलिवूडमध्ये आवर्जुन नाव घेण्यात येणारी जोडी म्हणजे रणधीर कपूर आणि बबिता. या दोघांनाही करिना आणि करिष्मा या दोन मुली असून त्यादेखील आई-वडीलांप्रमाणेच लोकप्रिय आहेत. बॉलिवूडची बेबो अर्थात करिनाने २०१२ मध्ये अभिनेता सैल अली खान याच्याबरोबर लग्न केलं असून त्यांना तैमूर नावाचा एक लहान मुलगादेखील आहे.

दरम्यान, या अभिनेत्यांप्रमाणेच कुणाल खेमू हा देखील पटौदी खानदानाचा जावई असून शर्मिला टागोर यांचा तो जावई आहे. सैफची बहीण सोहा अलीने २०१५मध्ये कुणालबरोबर लग्न केले होते.