बाजीराव मस्तानी गाण्यातील ‘पिंगा’ गाणे या ना त्या कारणाने चर्चेत राहत आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याची तुलना ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे’ गाण्याशी करण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही गाण्यांची एकमेकांशी तुलना करणे चुकीचे असल्याचे मत अभिनेत्री माधुरी दीक्षितने मांडले.
माधुरी म्हणाली की, मी म्हणेन की ‘पिंगा’ आणि ‘डोला रे’ गाण्याची तुलना करू नका. ही गाणी जशी आहेत तसा त्यांचा आनंद घ्या. सध्या मी प्रवास करत असल्याने ‘पिंगा’ गाणे बघू शकलेले नाही. पण, मला खात्री आहे की प्रियांका आणि दीपिकाने हे गाणे सुंदर केले असेल. त्या दोघींनी गाण्यासाठी नक्कीच खूप परिश्रम घेतले असणार यात शंका नाही. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ चित्रपटात ‘डोला रे’ गाणे चित्रीत करण्यात आले होते. यात माधुरी आणि ऐश्वर्याची जुगलबंदी दाखविण्यात आली होती. तर आगामी ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘पिंगा’ गाण्यात प्रियांका आणि दीपिकाची जुगलबंदी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण या दोन्ही गाण्यांची एकमेकांशी तुलना करत आहेत.
‘बाजीराव मस्तानी’ येत्या १८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.