बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला स्वयंघोषित समीक्षक कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याने अभिनेत्री झायरा वसिमला इस्लाम धर्माचा दाखला देत अमिर खानची चमची असे म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा कमाल खान इस्लाम धर्मावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आहे. यावेळी त्याने राम मंदीरच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे.

“जर एका राम मंदिरामुळे संपूर्ण देशात शांतता आणि सुसंवाद होणार असेल, तर मुस्लिम नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिरबाबत सुरु असलेला खटला मागे घ्यावा. कारण एक मशिद संपूर्ण देशाच्या शांततेपेक्षा मोठे नाही. अस मला वाटतं” अशा शब्दात कमाल खानने राम मंदीरच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे.

केआरकेचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या ट्विटवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कमालला या ट्विटसाठी पाठिंबा दिला आहे. तर काहींनी कडक शब्दात त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे.

काय आहे राम मंदिर आणि बाबरीचा वाद?

  • अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याची धारणा आहे
  • १५ व्या शतकात प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं गेलं असाही आरोप आहे
  • १५ व्या शतकात मंदिर पाडून त्याजागी बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे
  • १८५३ मध्ये हिंदू संघटनांनी हा आरोप केला की राम मंदिर पाडून या ठिकाणी मशीद उभारली आहे. या आरोपावरुन पहिल्यांदा देशात हिंदू मुस्लीम दंगलही झाली
  • १८५९ मध्ये ब्रिटिशांनी वादग्रस्त जागेवर तारांचे कुंपण घालून, या कुंपणाबाहेर आणि आतमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधवांना वेगवेळी प्रार्थना करण्याची मुभा दिली
  • १८८५ मध्ये पहिल्यांदा हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहचलं. महंत रघुबरदास यांनी फैजाबाद येथील न्यायालयात राम मंदिराच्या निर्मितीसाठी अपिल केलं
  • २३ डिसेंबर १९४९ : जवळपास ५० हिंदूनी मशिदीच्या केंद्रस्थानी प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली, ज्यानंतर हिंदू बांधव पूजा करु लागले मात्र मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करणं बंद केलं
  • १६ जानेवारी १९५० : गोपाल सिंह विशारद यांनी फैजाबाद न्यायालयात अपील करुन रामलल्लाच्या पूजेसाठी विशेष परवानगी मागितली
  • ५ डिसेंबर १९५० : महंत रामचंद्र दास यांनी हिंदूंनी प्रार्थना सुरु ठेवावी यासाठी आणि मशिदीत रामाची मूर्ती ठेवण्यासाठी तक्रार दाखल केली, यावेळी मशिदीला पहिल्यांदाच ‘ढाँचा’ असा शब्द वापरण्यात आला
  • १७ डिसेंबर १९५९ : निर्मोही आखाड्याने वादग्रस्त जागा मिळावी म्हणून कोर्टात धाव घेतली
  • १८ डिसेंबर १९५९ : उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने मशिदीचा मालकी हक्क मिळावा म्हणून कोर्टात धाव घेतली
  • १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीचं कुलुप उघडण्यासंदर्भात आणि रामजन्मभूमीची जागा स्वतंत्र करण्यासाठी एक मोहीम सुरु केली. या जागेवर एक भव्य मंदिर उभारले जाईल ही घोषणा तेव्हाच देण्यात आली
  • १९८६ मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी वादग्रस्त जागेवर हिंदू बांधवांना पूजेची संमती दिली, कुलुपं उघडण्यात आली मात्र मुस्लीम बांधवांनी बाबरी मशीद अॅक्शन कमिटीची स्थापना केली
  • १९८९ मध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणजेच भाजपाने विहिंपच्या भूमिकेला औपचारिकरित्या पाठिंबा दिला, ज्यामुळे मंदिराचे थंडावलेले आंदोलन जोषात सुरु झाले
  • जुलै १९८९ मध्ये या प्रकरणातला पाचवा खटला दाखल करण्यात आला
  • १९९० मध्ये भाजपाचे अध्यक्ष असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून उत्तरप्रदेशातल्या अयोध्येपर्यंत एक रथयात्रा काढली, ज्यानंतर दंगली उसळल्या
  • १९९० मध्ये आडवाणींना समस्तीपूरमधून अटक करण्यात आली, ज्यानंतर भाजपाने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढला
  • ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकारने बाबरी मशिदीच्या शेजारी असलेल्या २.७७ एकर जमिनीचा ताबा घेतला
  • ६ डिसेंबर १९९२ हजारो कारसेवकांनी अयोध्येत पोहचत बाबरी मशिद पाडली, ज्यानंतर जातीय दंगली उसळल्या, घाईने तात्पुरत्या स्वरुपाचे एक मंदिर तयार करण्यात आले
  • १९९२ पासून हे प्रकरण प्रलंबितच आहे. आता नियमित सुनावणी होणार असल्याने हा वाद लवकरात लवकर मिटेल अशी अपेक्षा आहे.