दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. फक्त टॉलिवूडपुरताच मर्यादित न राहता या कलाकारांनी हिंदी भाषिक रसिकांमध्येही लोकप्रियता मिळवलीये. अशाच काही कलाकारांमध्ये आघाडीवर असणारी नावं म्हणजे अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी. बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारी ही जोडी खऱ्या अर्थाने ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात घर करुन गेली. त्यातही या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्यांची केमिस्ट्री चित्रपटाच्या लोकप्रियतेमागचं आणखी एक कारण होतं. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनुष्का आणि प्रभासमध्ये जवळीक वाढली असून, ते रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जाऊ लागलं. आणि मग काय…. व्हायचं तेच झालं. सर्वत्र या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.

विविध कार्यक्रमांना एकत्र गेल्यावर कॅमेऱ्यांच्या नजराही प्रभास आणि अनुष्कावरच खिळलेल्या असायच्या. पण, या दोघांनी कधीही याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही. प्रत्येक कार्यक्रमात खासगी आयुष्य, लग्न आणि अनुष्काविषयी प्रभासला प्रश्न विचारले जाऊ लागले. त्याविषयीच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रभासने काही गोष्टी स्पष्ट केल्या. अनुष्कासोबतच्या लिंकअपविषयी सांगताना प्रभास म्हणाला, ‘मला असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच. कारण, तुम्ही जेव्हा कोणा एका अभिनेत्रीसोबत वारंवार स्क्रीन शेअर करता त्यावेळी चर्चा होतातच. माझ्यासाठी ही बाब आता सर्वसामान्य आहे. आधी मला याविषयी वाईट वाटायचं पण, आता मला याची सवय झालीये.’

यावेळी त्याने लग्नाच्या चर्चांविषयीसुद्धा प्रतिक्रिया दिली. कोणताही सेलिब्रिटी नावाजला जाऊ लागल्यावर त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात अनेकांनाच रस असतो. त्याचप्रमाणे प्रभासच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांना कुतूहल आहे. याविषयीच सांगताना प्रभास म्हणाला, ‘सध्यातरी माझ्या फिमेल फॅन्सना चिंता करण्याची गरज नाहीये. कारण सध्यातरी मी असं काहीच (लग्न) करत नाहीये. किंबहुना मी याबद्दल कोणताच विचारही केला नाहीये.’ यावेळी प्रभासने आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

प्रभास आणि अनुष्का शेट्टी या दोघांची मैत्री आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बरीच चर्चेत आहे. इतकच नाही तर, त्यांच्या या रिलेशनशिपमुळे अनुष्काचं लग्न होत नसल्याचंही एका वेबसाइटने म्हटलं होतं. पण, खुद्द प्रभास मात्र या सर्व गोष्टींपासून बराच दूर असून तो आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काळात तो ‘साहो’ या अॅक्शनपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.