गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी चर्चेत आहे. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दुसरीकडे तिच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. अनुष्का लोकप्रिय दिग्दर्शक प्रकाश कोवेलमुडीशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. आता अनुष्काने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

नुकताच अनुष्काने आयबी टाईम्सला मुलाखत दिली. दरम्यान तिला तिच्या लग्नाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने राग व्यक्त करत, ‘मला कळत नाही लोकं अशा अफवा कसे काय पसरवू शकतात? एखाद्या बद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या तर त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवर देखील होतो. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे’ असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘माझं शरीर, माझी मर्जी’ म्हणत क्लीवेजमुळे ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर

‘माझ्या लग्नाच्या सर्व अफवा आहेत. माझ्यावर या अफवांचा जराही परिणाम होत नाही. लोकांना माझे लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट का वाटते? कोणीही आपले नाते लपवणार नाही. मग मी का माझ्या लग्नाची गोष्ट गोपनीय ठेवेल. या सर्व संवेदनशील गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत चर्चा करताना विचार करायला हवा’ असे अनुष्का पुढे म्हणाली. त्यानंतर अनुष्काने जेव्हा कधी लग्न करेल तेव्हा तुम्हा सर्वांना नक्की कळवेन असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्का दिग्दर्शक प्रकाश कोवेलमुडीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. प्रकाश हा तेलुगू चित्रपट दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांचा मुलगा आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून देखील काम केले आहे. ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रकाशने २०१७ मध्ये कनिका ढिल्लोंला घटस्फोट घेतला.