‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट म्हणजे बाजीरावाचा चरित्रपट नव्हे. तर बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेने प्रभावित होऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. तो ना. स. इनामदारांच्या ‘राऊ’ या कादंबरीवर बेतला असल्याचे निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

वीरश्रीने भरलेला बाजीराव आणि त्याची उत्तरेतील मस्तानीशी झालेली भेट, त्यांच्यातील प्रेमाने मला आजवर भारावून टाकले आहे. हा चित्रपट बाजीरावाचा ‘चरित्रपट’ म्हणून पडद्यावर आणायचा नव्हता. म्हणूनच सगळे संदर्भ तपासल्यानंतर ‘राऊ’ या कादंबरीवरून चित्रपटाची कथा बेतण्यात आली आहे, असे भन्साळी यांनी सांगितले. काशीबाई एका पायाने अधू होत्या म्हणजे त्या नाचणारच नाहीत, असेही आक्षेप आहेत. पण, हे आक्षेप घेण्यापूर्वी ‘पिंगा’ गाणे चित्रपटात कोणत्या संदर्भाने वापरण्यात आले आहे, त्यात काय दाखवण्यात आले आहे हे आधी लोकांनी समजून घ्यायला हवे. चित्रपट पाहिल्याशिवाय टीका करणे योग्य नसल्याचे मत भन्साळी यांनी व्यक्त केले.

काशीबाई आणि मस्तानी यांच्यात नेमके कशा प्रकारचे नाते होते, याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांची मते वेगवेगळी आहेत . या संदर्भात, काहींनी काशीबाई-मस्तानी कधीच भेटल्या नाहीत इथपासून ते त्या एकदाच भेटल्या, त्या पाचदा भेटल्या.. अशी वेगवेगळी माहिती दिली. त्यामुळे चित्रपटात काय घ्यायचे याचा निर्णय त्या कथेनुरूप घेण्यात आला
– संजय लीला भन्साळी ,दिग्दर्शक