इतिहासाच्या आठवणी जाग्या करण्यासाठी सध्या कलाविश्वामध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली असून हा ट्रेंड आता हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीतही येऊ लागला आहे. पानिपतची लढाई साऱ्यांच्याच स्मरणात आहे. मात्र या लढाईनंतरची परिस्थिती कशी होती याचा उलगडा लवकरच होणार आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच’ या चित्रपटात पानिपतच्या लढाईनंतरच्या वास्तवावर भाष्य करण्यात येणार आहे.

जीवन जाधव आणि जितेश मोरे निर्मित या चित्रपटाचं जून महिन्यात चित्रिकरण सुरु होणार असून पहिलं टप्प्याचं चित्रिकरण राजस्थानमध्ये पार पडणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं.

”मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम म्हणजे पानिपतचा पराभव, त्या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागलं. त्या गुलामांची शौर्यगाथा म्हणजे ‘बलोच’’ असं चित्रपट दिग्दर्शकांनी सांगितलं. दिग्दर्शक प्रकाश पवार यांचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा चित्रपट आहे यापूर्वी ‘रांजण’ आणि ‘मिथुन’ या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हेदेखील स्क्रीन शेअर करणार असून प्रवीण तरडे आणि भाऊराव कऱ्हाडे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्याचबरोबर विशाल निकम, रोहित आवाळे हे नव्या दमाचे कलाकारसुद्धा आपल्या भेटीस येणार आहेत.