संजय दत्त आणि माधुरी दिक्षित म्हणजे एकेकाळची मोठ्या पडद्यावरील सुपरहिट जोडी. दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांनाही प्रचंड आवडायची. साजन आणि खलनायक हे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. संजय दत्त आणि माधुरीला एकत्र काम करुन तब्बल दोन दशकं उलटली आहेत. १९९७ मध्ये आलेल्या ‘महानता’ हा दोघांचा शेवटचा चित्रपट होता. मात्र ‘कलंक’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही सुपरहिट जोडी पाहण्याची संधी मिळणार आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तने माधुरी दिक्षितच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा संजय दत्तला माधुरीच्या आठवणींबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की ‘अत्यंत सुंदर, अप्रतिम, विनम्र आणि एक महान अभिनेत्री’.

यावेळी संजय दत्तने माधुरीसोबतच्या ‘तम्मा तम्मा’ गाण्यासाठी आपण कशाप्रकारे दोन महिने आधी सराव करत होतो यासंबंधीच्याही आठवणी सांगितल्या. ‘मला डान्सिंग वैगेरे येत नाही. माधुरीसोबत गाणं होतं आणि तेदेखील हे…मी म्हटलं हे गाणं शूट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी दोन महिने सराव करत होत’, असं संजय दत्तने सांगितलं.

दरम्यान, संजय दत्त आणि माधुरी पुन्हा एकदा ‘कलंक’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. धर्मा प्रोडक्शनचा हा चित्रपट अभिषेक वर्मन दिग्दर्शित करणार आहे. चित्रपटात वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य राय कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.