छोट्या पडद्यावरील ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. यातलाच एक कलाकार म्हणजे वैभव माथूर. ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत वैभवने टीकाराम ही भूमिका साकारली आहे. सध्या ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरत आहे. मात्र, वैभवचा कलाविश्वात येण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. अलिकडेच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वैभवने त्याचा संघर्षप्रवास सांगितला आहे.

“सुरुवातीच्या काळात काम मिळावं यासाठी मी अनेकांच्या भेटी घेतल्या. मात्र, कुठेच काम मिळत नव्हतं. पण कधी ना कधी तरी काम मिळेल हा आशावाद कायम माझ्यासोबत होता. अनेक ऑडिशनसाठी मी पायी प्रवास केला आहे. त्यावेळी ध्येयाने झपाटलो होतो, एक उत्साह होता. त्यामुळे अनेक मैलांचं अंतर सहज हसत हसत पार केलं. अनेकदा वाटेत तहान लागायची मग एखादं चहाचं दुकान शोधून किंवा वाटसरुकडून पाणी मागून प्यायचो. त्यावेळी बेसलरी घ्यावी इतके पैसे नसायचे”, असं वैभव म्हणाला.

दरम्यान, वैभव माथूर भाभीजी घर पर है या मालिकेत टीकाराम ही भूमिका करत असून आज तो लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. विनोदशैलीच्या जोरावर वैभवने अनेकांना आपलसं केलं आहे.