"काही पक्षांसाठी निवडणुका महत्वाच्या असतात, पण आमच्यासाठी निवडणुका नाही तर जनतेची कामं महत्वाची आहेत", असं प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भाडिपाच्या लोकमंचावर केलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकमंचावर हजेरी लावली होती. यावेळी राजकारणासह अन्य विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालत शहर विकसित करणे गरजेचं आहे. रुळलेल्या शिक्षणपद्धतीपेक्षा रिसर्चयुक्त शिक्षणाची गरज आहे. इंटरनेट, केबल, वायफाय कनेक्टिव्हिटी यासोबतच चांगली शहर कशी निर्माण होतील हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. राजकीय ते वैयक्तिक प्रवासाबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांवर चौफेर फटकेबाजी करत निवडणुका, शिक्षण,पर्यावरण, कायदा, तसेच पक्षाची भूमिका यासारख्या अनेक मुद्द्यांबाबतचा आपला दृष्टीकोन आदित्य यांनी यावेळी उलगडून दाखवला. कलाकृती विरोधात होणाऱ्या स्थानिक सेन्सॉरशिपबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली असून यापुढे सुद्धा हीच भूमिका असेल असं सांगत तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगा, त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ‘राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नाही तर राजकारणातून समाजकारण करणे महत्त्वाचे’ असं सांगत प्रत्येकाने यासाठी आवर्जून मतदान करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगवेगळ्या माध्यमातून विकासाचे अनेक पर्याय उपलब्ध होत असताना व ते करून देत असताना त्यात समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संवादक सविता प्रभुणे यांच्यासोबत रंगलेल्या या औपचारिक गप्पा उत्तरोत्तर चांगल्याच रंगल्या.