‘मैंने प्यार किया’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातून लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. सलमान खान आणि भाग्यश्रीची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. पण या पहिल्या चित्रपटानंतर तिने लग्न केले आणि चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. भाग्यश्रीच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. आता भाग्यश्रीने एका मुलाखतीमध्ये याबाबत मजेशीर खुलासा केला आहे.

नुकताच भाग्यश्रीने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नापासून ते बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. ‘माझ्या पतीला माझ्या चाहत्यांनी खूप सुनावले होते. कारण त्यांना असे वाटले की हिमालय मला लग्न करुन बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर घेऊन गेला. मला असं वाटतं प्रत्येकजण त्याला सुनावत होते. पण इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला होता’ असे भाग्यश्री म्हणाली.

आणखी वाचा : सलमानची ही हिरोईन होती प्रभासची क्रश, ‘या’ चित्रपटात साकारणार आईची भूमिका

पुढे तिने ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाबाबत देखील खुलासा केला आहे. तिने सुरुवातीला चित्रपटासाठी नकार दिला होता. पण सूरज बडजात्या यांनी सतत चित्रपटसाठी विचारल्यामुळे तिने होकार दिल्याचे सांगितले. आता लवकरच भाग्यश्री दाक्षिणात्य सुपस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.