बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायकांनी आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवल्याचे या आधीदेखील पाहायला मिळाले आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘भय’ या मराठी चित्रपटाद्वारे गीतकार, संगीतकार आणि गायक अशा तीन आघाड्यांवर बॉलीवूडमध्ये कार्यरत असलेले गीतकार शेखर अस्तित्व, गायिका तुलिका उपाध्याय, गायक - ब्रिजेश शांडिल्य व अली असलम आणि संगीतकार विक्रम माँटरोज एकत्र आल्याचे पाहायला मिळते. ‘रॉकी हँडसम’, ‘इश्क क्लिक’ सारख्या अनेक चित्रपट, मालिका व म्युझिक अल्बमसाठी गीते लिहिणाऱ्या गीतकार शेखर अस्तित्व यांनी ‘भय’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत गीतलेखन केलं असून, संगीतकार विक्रम माँटरोज यांनी त्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली आहे. ‘भय’च्या ध्वनीफितीत तीन वेगळ्या धाटणीची गीते ऐकायला मिळतील. लोकप्रिय हिंदी चित्रपटातील गीते, मलिकांची शीर्षकगीते, जाहिराती व जिंगल्समधील आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका तुलिका उपाध्याय यांच्यासोबत ‘तनु वेड्स मनू’, ‘जय हो’ फेम ब्रिजेश शांडिल्य यांनी ‘साजना..’ ‘मी आलो..’ या गीतांना स्वरसाज दिला आहे. सुफी व गझल गायकीत ख्याती असणारे अली असलम यांनी यातील ‘चल रे..’ हे भावपूर्ण गीत गायलं आहे. सचिन कटारनवरे निर्मित ‘भय’ चित्रपटातील या गाण्यांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देत आहेत हे जाणून घेण्यासाठी ही मंडळी खूप उत्सुक आहेत. मराठी चित्रपटासाठी गीत गाण्याचा अनुभव या सगळ्यासाठीच धमाल होता. गाण्याचा अर्थ समजून घेत, शुद्ध उच्चारण करून त्यांनी ही गीते गायली. ‘५ जी इंटरनशनल’ निर्मितीसंस्थेच्या ‘भय’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल भातणकर यांचे आहे. अजय जोशी यांची सहनिर्मिती असलेल्या ‘भय’ चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आशिष चौहान यांनी सांभाळली असून अनिल साबळे हे सह-निर्माते आहेत. १६ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘भय’चे बॉलीवूड संगीत प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करणार हे निश्चित!