मार्च महिन्यात अभिनेता कार्तिक आर्यनला करोनाची लागण झाल्याने ‘भूलभूलैय्या २’ या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं. आता त्याची तब्येत स्थिर आहे. पण आता या चित्रपटासमोर एक नवं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना आता बघ्याची भूमिका घेण्याव्यतिरिक्त काही पर्याय उरलेला नाही.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘भूलभूलैय्या-२’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बझमी यांनी आता वाट बघत बसण्याशिवाय काही पर्याय नसल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, “मी वाट पाहत आहे कारण लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे आणि अशा अफवा आहे की मुंबईमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू शकतो. त्यामुळे आम्हाला काहीही नियोजन करता येत नाही. कार्तिक खूप चांगला आहे. तो म्हणाला आहे की तुम्ही जेव्हा चित्रीकरणाचं नियोजन कराल, तेव्हा मी चित्रीकरणासाठी यायला तयार आहे.”

मीड डे या वेबसाईटने याबद्दलचे वृत्त प्रकाशित केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

लॉकडाऊनमुळे थांबलेलं काम मार्चच्या सुरुवातीला पुन्हा सुरु झालं होतं. मात्र, मुख्य भूमिकेतल्या कलाकारालाच करोनाची लागण झाल्याने चित्रीकरण पुन्हा बंद पडलं. पवई इथल्या स्टुडिओत या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता. मात्र, तो पुन्हा पाडण्यात आला. अशा द्विधा मनस्थितीचा सामना करताना बझमी म्हणाले, “आता आम्हाला पुन्हा चित्रीकरण सुरु करण्यासाठी पुन्हा सेट उभारावा लागणार आहे. पण जर सेट उभारल्यानंतर लॉकडाऊन लागला, तर मात्र निर्मात्यांचं फार मोठं नुकसान होईल. त्यामुळे आमच्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.”

आणखी वाचाः करोनावर मात केल्यानंतर कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार, किंमत वाचून व्हाल थक्क

या चित्रपटाचं चित्रीकऱण मुंबई आणि लखनौ इथे होणार आहे. पण मुंबईतील चित्रीकरण पूर्ण झाल्याशिवाय लखनौ इथे जाता येणार नाही. करोना प्रादुर्भावामुळे मुंबईतील चित्रीकऱण लांबणीवर पडलं असून पर्यायाने लखनौमधील चित्रीकरणही करता येणं शक्य नाही.

ते असंही म्हणाले, “कितीही काळजी घेतली तरी कोणा ना कोणाला करोनाची लागण होतच आहे. सामान्य परिस्थितीपेक्षा अशा परिस्थितीत चित्रीकऱण करणं फार अवघड आहे. त्यामुळे चित्रपटाचं बजेटही जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढलं आहे.”

‘भूलभूलैय्या २’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत राजपाल यादव, किआरा अडवाणी आणि तब्बू हेही कलाकार दिसणार आहेत. अभिनेता अक्षय कुमारच्या ‘भूलभूलैय्या’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.