सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली आहे. अंमली पदार्थ खरेदी व सेवन करण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईवर बॉलिवूड अभिनेत्री बिदिता बाग हिने प्रतिक्रिया दिली आहे. रिया चक्रवर्तीला अखेर अटक झाली. कृपया आता तरी देशातील महत्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करावं. ज्यांचा सामना आपला देश करतोय. अशा आशयाचं ट्विट बिदिताने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “आता खरी माहिती बाहेर पडेल”; सुशांत प्रकरणावर वकिल विकास सिंह यांची प्रतिक्रिया

यापूर्वी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. रिया चक्रवर्ती ही कुटुंबातील ही दुसरी अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.