अनुप जलोटा आणि जस्लीन मथारू यांच्या नात्यानं आता विचित्र वळण घेतलं आहे. बिग बॉसमध्ये आतापर्यंत प्रेमी युगुलाप्रमाणे हे दोघंही वावरत होते. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या पडल्या अनुप यांनी आपलं आणि जस्लीनचं नातं हा केवळ बनाव असल्याचं सांगत चर्चेला वेगळा विषय दिला. आता चक्क त्यांनी जस्लीनच्या वडिलांकडे तिचं कन्यादान करण्याची परवानगी मागून आणखी एक धक्का दिला आहे. त्यांच्या विचित्र वागण्यानं जस्लीन मात्र दु:खी झाल्याचं समजत आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनुप जस्लीनच्या वडिलांना भेटायला गेले. या भेटीत जस्लीनच्या वडिलांकडे मी तिचं कन्यादान करण्याची परवानगी मागितली असं अनुप यांनी मुलाखतीत सांगितलं. विशेष म्हणजे जस्लीनच्या वडिलांनी आपल्याला कन्यादान करण्याची परवानगी दिली असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं. तर दुसरीकडे जस्लीननं केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझा वापर केला असा आरोपही त्यांनी केला. ‘पण, माझ्या नावाचा गैरवापर करून तिचं भलं होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. माझ्या प्रसिद्धीचा वापर करून स्वत: प्रसिद्ध होण्यास ती आता यशस्वी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी घरातून बाहेर पडल्यावर दिली.

बिग बॉस स्क्रिप्टेड असतं, जस्लीनसोबत माझं नातं बिग बॉसने प्लान केलं होतं. माझं आणि जस्लीनचं नातं गुरु आणि शिष्याचं आहे. मला जस्लीननं बिग बॉसमध्ये तिच्यासोबत येण्याचा आग्रह केला. जस्लीनच्या वडिलांनी देखील तोच आग्रह धरला. तेव्हा गुरु आणि शिष्य बनूनच या शोमध्ये येऊ असं आम्ही दोघांनीही ठरवलं. मात्र तुम्ही जर गुरु आणि शिष्य म्हणून या शोमध्ये आलात तर हा शो चालणार नाही, तेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात असं सांगूनच शोमध्ये प्रवेश करा असं बिग बॉस तर्फे आम्हाला सांगण्यात आलं त्यामुळे आम्ही तसंच वागलो असा गौप्यस्फोट अनुप जलोटा यांनी केला.

तर दुसरीकडे अनुप आणि मी तीन वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहोत असं जस्लीन म्हणत होती. पण आता मात्र एक्स गर्लफ्रेण्डचं कन्यादान करायचं असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर जस्लीन आणि अनुप यांची जोडी खऱ्या अर्थानं बिग बॉसच्या घरातील विचित्र जोडी होती हे आता सिद्ध झालंय अशाही प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.