प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा आणि जस्लीन मथारु यांच्यामुळे ‘बिग बॉस’चं १२ वं पर्व पहिल्या दिवसापासून गाजत आहे. सर्वत्र या जोडीची चर्चा रंगत असतानाच या घरातील कृति आणि रोशमी या जोडीला पहिल्या आठवड्यातच घराबाहेर जावं लागलं आहे. त्यामुळे आता हा शो खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

‘टाईम्स नाऊ’नुसार, ‘बिग बॉस’चं १२ वं पर्व विचित्र जोडी या संकल्पनेवर अधारित असून यामध्ये स्पर्धकांच्या जोड्या पहायला मिळत आहेत. यातील कृति आणि रोशमीच्या जोडीला पहिल्याच विकेंडच्या डावात बाहेर पडावं लागलं. यावेळी रोशमी आणि माझं बॉण्डींग चांगलं नसल्यामुळेच आम्हाला बाहेर पडावं लागल्याचं कृतीने सांगितलं.

”बिग बॉस’च्या घरातील जवळपास सर्वच सदस्य एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखत होते. मात्र माझं आणि रोशमीचं असं नव्हतं. आमची पहिली ओळख या शोदरम्यानच झाली. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये आमच्यात मैत्री होऊ शकली नाही. परिणामी आमचं बॉण्डींग चांगलं नसल्याचं साऱ्यांच्याच लक्षात आलं. त्यामुळेच कॅप्टन्सीच्या टास्कमध्येदेखील आम्ही एकजुटीने काम करु शकलो नाही’, असं कृती म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘विकेंड वॉरमध्ये घरातल्या सदस्यांनी सबा-सोमी या जोडीवर अनेक आरोप केले होते. मात्र ऐनवेळी मला आणि रोशमीला नॉमिनेट केलं. त्यामुळे आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी त्यांनी ही योजना आखली असावी’.

दरम्यान, वादग्रस्त ‘बिग बॉस’च्या १२ व्या सिझनमध्ये गायक अनुप जलोटा, नेहा पेंडसे, दीपिका कक्कड, सृष्टी रोडे, श्रीसंत, करणवीर बोहरा, यासारखे सेलिब्रेटी झकल्याचं पाहायला मिळत आहे.