बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे राखी सावंत कायमच चर्चेत असते. कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी चित्रविचित्र दावे करत राखी कायम प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या ही ड्रामा क्वीन बिग बॉस १४’ मध्ये सहभागी झाली असून या घरात प्रवेश केल्यापासून ती चर्चेत आली आहे. अलिकडेच झालेल्या भागात राखीने तिच्या करिअरविषयी आणि पर्सनल लाइफविषयी अनेक खुलासे केले. यात कॉन्ट्रॉव्हर्सी केली पण कधी रस्त्यावर भीक मागितली नाही, असं वक्तव्य राखीने केलं आहे.

“बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मी सहभागी झाली होते. खरं तर या शोमुळेच मला खरी ओळख मिळाली. माझे कुटुंबीय माझ्याजवळ आले. त्यांना माझा अभिमान वाटू लागला. बऱ्याच वेळा असं म्हणतात ना की मुलगाच सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ शकतो. मुलगी काहीच करु शकत नाही. पण आता मुली चंद्रावर पोहोचल्या आहेत. मी करिअरमध्ये बरंच काही केलं. प्रेक्षकांना हसवलं. काही जण मला ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ म्हणतात. पण, निदान मी काही तरी करण्याचा प्रयत्न तरी केला. रस्त्यावर बसून भीक तर मागितली नाही आणि काही चुकीचंदेखील केलं नाही. मी कधीच रडले नाही. पण एकदा माझ्या डोळ्यात पाणी आलं ते माझ्या वडिलांना पाहून. कारण, माझ्या मुलीने काही तरी करुन दाखवलं हे त्यांच्या डोळ्यात मला दिसत होतं. त्यामुळे त्यांना पाहून मला रडू आलं”, असं राखी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “आता माझ्या कुटुंबीयांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. सगळे जण म्हणतात तू आयुष्यात काही तरी करुन दाखवलं. यात मला एकाच गोष्टीचा आनंद आहे तो म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत माझे वडील मला बोलत होते तू जे काही केलंस ते चांगलं केलंस. तसंच माझ्या लग्नाविषयी अनेक चर्चा रंगतात. पण मी खरंच लग्न केलं आहे. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाहीये”. दरम्यान, राखीने ‘बिग बॉस १४’च्या घरात प्रवेश केल्यापासून तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अलिकडेच राखीचं घरातील सदस्यांसोबत भांडणदेखील झालं होतं.