छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त व चर्चेत राहणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या चौदाव्या पर्वात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी रुबिना दिलैकशी झालेल्या वादानंतर कविता कौशिकने बिग बॉसचं घर सोडलं. त्यानंतर आता सलमान खानच्या बोलण्यावरून गायक राहुल वैद्यने घरातून काढता पाय घेतला.

‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये राहुल वैद्यने घरी परत जाण्यासाठी विनंती केली. “मी माझ्या कुटुंबीयांपासून फार दिवस लांब नाही राहिलो. मी मानसिकदृष्ट्या स्थिर आणि सक्षम आहे पण कुटुंबीयांपासून लांब राहून मी जगू शकत नाही. या शोमध्ये मला फारसा रस नसल्याने मी नीट खेळलो नाही हे मान्य करतो. मी हे मनापासून बोलतोय की, जे खरंच पात्र आहेत त्यांना बिग बॉसचं घर सोडावं लागू नये म्हणून मला या घरातून बाहेर जायचंय”, असं तो म्हणाला. राहुलने चाहत्यांनी व निर्मात्यांची माफी मागितली.

आणखी वाचा : एकटा जीव सदाशिव.. घटस्फोटानंतर ‘हे’ मराठी कलाकार आहेत सुखी-समाधानी

त्याच्या या वक्तव्यानंतर सलमानने त्याला खडेबोल सुनावले. “जर तू मनापासून हा खेळ खेळू शकत नाही तर तुझं या घरात राहणं व्यर्थ आहे. आम्ही तुला ऑफर दिली आणि ती तू स्वीकारली. ठीक आहे. तुला या शोमध्ये रस नव्हता म्हणून तू चुकीच्या व्यक्तींना वाचवलंस. घराची आठवण येत असल्यामुळे शो सोडणारा तू पहिला व्यक्ती असशील”, असं म्हणत सलमाननेही त्याचा निर्णय सांगितला. जनतेकडून राहुल वैद्यला घरात राहण्यासाठी पुरेशी मतं मिळाली होती. तरीसुद्धा तो बिग बॉसचं घर सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहिला.