छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला शो अर्थात 'बिग बॉस मराठी'च दुसरं पर्व यंदा चांगलं चर्चिलं गेलं. या शोमध्ये सहभाग घेतलेला प्रत्येक स्पर्धक या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिला. त्यातच वाईल्ड कार्ड एण्ट्रीने घरात आलेला आरोह वेलणकर या स्पर्धकाची विशेष चर्चा रंगली. विशेष म्हणजे हा शो संपल्यानंतरही त्याची चर्चा काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. त्यातच आता त्याने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केल्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. आरोहने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुख्यमंत्री मदतनिधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री कार्यालयातूनही आरोहचं या स्त्युत्य उपक्रमाचं कौतुक करत ट्विटरवरुन याची माहिती दिली. Thank you Aroh Welankar for your online contribution of ₹1,00,000 towards #CMReliefFund #MaharashtraFloods pic.twitter.com/68NKIXcaHb — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2019 "सामाजिक कार्य करण्याकडे माझा कायमच कल असतो. यापूर्वीही मी अशीच काही माध्यमातून मदत केली आहे. मात्र मी केलेल्या मदतीविषयी मला फार काही बोलायला किंवा सांगायला आवडत नाही. परंतु यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेच याविषयी ट्विट केले आहे,” असं आरोहने सांगितलं. पुढे तो म्हणतो, “जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होतो. तेव्हा महाराष्ट्रावर एवढं मोठे संकट कोसळले होते. बाहेर आल्यावर मला या गोष्टीची जाणीव झाली. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना आर्थिक बळाची आवश्यकता असते. आपणही त्यात खारीचा का होईना वाटा उचलावा ही इच्छा झाली. आणि मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मदतनिधी दिला. दरम्यान,आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. 'आय व्होट' सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो.