‘बिग बॉस’मधील माजी स्पर्धक आणि कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया निधन झालं आहे. बंगळुरुतील एका वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून जयश्री नैराश्याचा सामना करत होती. त्यामुळे हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी तिने सोशल मीडिया पेजवरुन जीवन संपवण्याचे संकेतही दिले होते.

जुलै २०२० मध्ये जयश्रीने फेसबुकवर लाइव्ह येत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने जीवनाचा कंटाळा आल्याचं म्हटलं होतं. तसंच मला मृत्यू मिळावा अशी केविलवाणी विणवणीदेखील केली होती. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीपने तिची मदत केली होती. तिला या नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ६ महिन्यांनंतर अखेर राजश्रीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

“मी सोडते सगळं. या जगाला आणि नैराश्याला कायमचा निरोप देत आहे. हे सारं मी पब्लिसिटी स्टंटसाठी करत नाहीये. मला सुदीप सरांकडून कोणतीही आर्थिक मदत सुद्धा नकोय. मला जगायचं नाही, कारण मी माझ्या नैराश्याचा सामना करु शकत नाहीये”, असं जयश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

पुढे ती म्हणाली होती, “मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, पण नैराश्याचा सामना करते. काही वैयक्तिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लहानपणापासूनच माझ्यासोबत दगाबाजीच होत आली आहे. मी घाबरट आहे. मला मरायचं आहे, सध्या माझी फक्त ही एकच इच्छा आहे. मी एक मुलगी नाहीये.”

वाचा : शेतकऱ्यांबद्दल ‘ते’ वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रँण्डने तोडला करार

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर राजश्रीने काही काळाने तो फेसबुकवरुन डिलिट केला होता. तसंच किच्चा सुदीपचे आभारदेखील मानले होते. किच्चा सुदीपसाठी तिने एक पोस्टदेखील शेअर केली होती. मला वाचवलंत आणि माझी काळजी घेतल्यामुळे मनापासून तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार. तुम्हा सगळ्यांना काळजीत टाकल्यामुळे माफी मागते असं ती म्हणाली होती.

दरम्यान, जयश्री कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘बिग बॉस कन्नड 3’ मध्ये सहभागी घेतला होता. मात्र, सोमवारी दुपारी बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे हे आत्महत्येचे प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून जयश्री नैराश्याचा सामना करत होती.