‘बिग बॉस मराठी’चं २ पर्व सुरु होऊन बरेच दिवस झाले आहेत. आतापर्यंत या घरामध्ये काही नॉमिनेशन टास्कदेखील झाले असून घरातील काही सदस्यांना येथून बाहेर पडावं लागलं. त्यातच आता आणखी एक नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. त्यामुळे या आठवड्यातही घरातील एका सदस्याला घराबाहेर पडावं लागणार आहे. विशेष म्हणजे नॉमिनेशन टास्कसाठी एक विशेष कार्य सोपविण्यात येणार आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे भवितव्य नशिबावर आणि त्यांच्या चांगल्या वाईट कामांवर अवलंबून असते. घरातील सदस्यांनी आजवर केलेल्या चुका, चांगली काम यांना तपासण्यासाठी बिग बॉस सदस्यांवर “हिशोब पाप पुण्याचा” हे नॉमिनेशन कार्य सोपवणार आहेत. या कार्यात इतर सदस्यांना स्वर्गात पाठवून सेफ करायचं की नरकात पाठवून नॉमिनेट करायचे याचा निर्णय कार्यप्रमुख आणि त्यांचे दोन सल्लागार यांच्यावर अवलंबून असणार आहे. आता कार्यप्रमुख आणि सल्लागार कोणाला वाचवणार आणि कोणाला नॉमिनेट करणार हे बघणे रंजक असणार आहे.

“हिशोब पाप पुण्याचा” – नॉमिनेशन टास्क

या टास्कमध्ये परागने अभिजीत केळकरवर झालेले आरोप सल्लागार माधव आणि नेहा तर कार्यप्रमुख शिवला पुन्हा एकदा सांगितले. ज्यामध्ये पराग आणि माधवमध्ये बरेच वाद विवाद झाले. परागने असे देखील सांगितले कि, “या तिघांवर माझा विश्वास नाही. तुम्हांला हवा तो निर्णय घेऊन टाका.” म्हणजेच शिव, माधव आणि नेहावर त्याचा विश्वास नाही. आता या दोघांमध्ये कोण वाचणार आणि कोण नॉमिनेट होणार बघू या. किशोरी शहाणे यांनी सुरेखा पुणेकर यांच्याविषयी त्यांचे मुद्दे मांडले, ज्यामध्ये त्या म्हणाल्या, “त्यांना जोपर्यंत कोणी काम सांगत नाही तो पर्यंत त्या घरात स्वयंपाक करत नाहीत, त्यांना सांगितल तरच त्या उठतात, बऱ्याचदा तर त्या झोपूनच असतात, त्या सिनियर आहेत त्यामुळे त्यांना कोणी काही बोलत नाहीत. आजपर्यंत कधीही माझ्यासाठी कोंबडा आरवला नाहीये.” त्यावर सुरेखा ताईंनी देखील त्यांची बाजू मांडली. “मला त्रास होतो म्हणून मी झोपले मी मान्य करते, पण घरात माझी काय चूक आहे हे दाखवून द्या? मी स्वर्गात जाण्यास पात्र आहे आणि किशोरीने नरकात जावे असे माझे मत आहे.” आता कोणाच्या बाजूने निर्णय होईल हे आज कळेलच.

नवा कॅप्टन – शिव ठाकरे : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल घरातील नवीन कॅप्टन निवडण्यासाठी ‘मनोरा विजयाचा” हा टास्क किशोरी आणि शिव ठाकरेमध्ये रंगला. ज्यामध्ये कार्याच्या शेवटी शिवने या कार्यामध्ये बाजी मारली आणि घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. आता शिव दुसऱ्यांदा घराचा कॅप्टन बनला असून त्याच्या कारकिर्दीत घरामध्ये किती शांतता टिकून राहील आणि आलेल्या परिस्थितीला कसे सांभाळून घेईल हे कळेलच.