बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व काही दिवसांपूर्वीच संपलं आणि मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली. या रिअॅलिटी शोच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये मेघा धाडे आणि सई लोकूर यांच्या वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यावर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सई व्यक्त झाली आहे.

सुरुवातीला सई, मेघा आणि पुष्कर यांच्यात चांगली मैत्री झाली होती. पण शर्मिष्ठा राऊत घरात आल्यानंतर सई आणि पुष्कर मेघापासून दूर झाल्याचं पाहायला मिळालं. याविषयी सई म्हणते, ‘प्रत्येक जण बिग बॉसच्या घरात एक कम्फर्ट झोन शोधत होता. शर्मिष्ठाला तो कम्फर्ट झोन मेघामध्ये मिळाला. त्या घरात एकटं राहून खेळणं शक्य नाही. तुम्हाला मैत्रीची गरज असतेच. पण मेघाने बाराव्या आठवड्यात कॅप्टनसीसाठी आस्तादचं नाव घेतलं तेव्हा मला राग आला. तेव्हा तिने माझा विश्वासघात केला. त्यामुळे पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवत मैत्री करणं माझ्यासाठी कठीण होतं.’

वाचा : मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खान

बिग बॉसच्या जे काही झालं ते फक्त त्या खेळापुरतं होतं असंही सईने यावेळी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे यापुढे आमच्यात मैत्री कायम राहील असंही ती म्हणाली.