लॉकडाउनमुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचे शूटींग थांबवण्यात आले होते. पण अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली. त्यासाठी काही नियम आखण्यात आले. पण आता बॉलिवूडची हॉट गर्ल बिपाशा बासूने चित्रीकरण बंद करण्याची मागणी केली आहे.

सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण सुरु आहे. त्यामुळे कलाकार सुरक्षित नाहीत असे बिपाशा बासूने म्हटले आहे. ‘परिस्थिती थोडी चांगली होईपर्यंत सर्व शूट थांबवले पाहिजेत. कारण शूटिंग करताना सेटवर अभिनेते सर्वात असुरक्षित असतात. सेटवरील जवळपास सर्व यूनिट पीपीई किट, ग्लोज, मास्क घालून असतात. पण कलाकारांना कोणतेही संरक्षण न घेता शूट करावे लागते. त्यामुळे हे थोडे भीतीदायक आहे’ असे तिने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये अनुराग बासुची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथानला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पार्थने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर बिपाशाने हे ट्विट करत तिचे मत मांडले आहे.

पार्थने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. ‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्या’ असे त्याने म्हटले होते.