बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या काळवीट शिकार प्रकरणी प्रकाशझओतात आला आहे. जवळपास वीस वर्षांपूच्या या घटनेची आज सुनावणी असून आता सलमानचं भवितव्य काय असणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. एक अभिनेता म्हणून सलमान त्याच्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात राहिला हे खरं. पण त्यासोबतच बऱ्याच वादांमुळेही तो नेहमीच चर्चेत राहिला. सलमान आणि वाद हे एक वेगळंच समीकरण आहे, असं म्हणायला हरकत नाही. चला नजर टाकूया सलमानचं नाव गोवलं गेलेल्या अशाच काही प्रकरणांवर…

ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं प्रेमप्रकरण-
सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं प्रेमप्रकरण कलाविश्वात बऱ्याच वर्षांपासून एक धुमसणारा विषय ठरला आहे. २००१ मध्ये त्यांच्या प्रेमप्रकरणाची एक वेगळीच बाजू सर्वांसमोर आली. ऐश्वर्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर सलमानने तिच्या घराबाहेर एकच गोंधळ घातल्याचं म्हटलं जात होतं.

हिट अँड रन केस-
२००२ मध्ये सलमान हिट अँड रन केसमध्ये अडकला होता. सलमाने मद्यधुंद अवस्थेत वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या चार जणांना चिरडले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात सलमानची निर्दोष मुक्तता केली होती.

विवेक ऑबेरॉयसोबतचा वाद-
ऐश्वर्या रायसोबत असलेल्या नात्यावरुन सलमान खान आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यातही वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं होतं. २००३ मध्ये घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत विवेकने सलनमानविषयी एक खुलासा केला होता. ज्यामध्ये त्याने सलमानने आपल्याला धमकावणारे मेसेज पाठवल्याचं सांगितलं होतं.

वाचा : ‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

शाहरुख खान आणि सलमानच्या नात्यात आलेला दुरावा-
२००८ मध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात अभिनेत्री कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीमध्ये खटके उडाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुखने सलमानविषयी अशी काही वक्तव्य केली होती, ज्यामुळे ‘दबंग खान’चा पारा चढला होता. पण, त्यानंतर २०१३ ला बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत त्या दोघांनीही हा वाद दूर सारल्याचं पाहायला मिळालं होतं.

२६/११ प्रकरणी सलमानचं वक्तव्य-
२६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी संवाद साधतेवेळी सलमानने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलं होतं. ज्या प्रकारे या हल्ल्याला महत्त्वं दिलं गेलं, ते पाहता मुंबईतील उच्चभ्रू लोकांवरच या हल्ल्यात निशाणा साधला गेल्याचं तो म्हणाला होता. त्यापूर्वी झालेल्या दहशतवादी कारवायांना इतकं महत्त्वं का दिलं गेलं नव्हतं, असा सवालही त्याने उपस्थित केला होता.

याकूब मेननविषयी केलेलं ट्विट-
याकूब मेननला फाशी दिल्यानंतर त्याचं समर्थन करणारं एक ट्विट सलमानने केलं होतं. ज्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठवण्यात आली होती. याकूब ऐवजी त्याचा भाऊ टायगर मेनन याला फाशी द्यायला हवी होती, असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं.

‘सुलतान’च्या प्रसिद्धीवेळी महिलांविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य-
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ या चित्रपटाच्या वेळीसुद्धा सलमानने एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे त्याच्यावर संपूर्ण महिला वर्गाने आगपाखड केली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी प्रश्न विचारला असता सलमान म्हणाला होता, प्रत्येक वेळी रिंगमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला बलात्कार झालेल्या एखाद्या महिलेप्रमाणे वाटतं, असं तो म्हणाला होता. ज्यानंतर त्याला जबर विरोध करण्यात आल्याचं पाहिलं गेलं होतं.