‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री विद्या बालन अनेकांचीच आवडती अभिनेत्री आहे. विविध भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देणारी विद्या काही दिवसांपूर्वीच ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका अनेकांचीच मनं जिंकून गेली. एकिकडे बोल्ड अंदाज आणि फिटनेसकडेच जास्त कल असणाऱ्या अभिनेत्रींची चर्चा असताना विद्याने मात्र ही चौकट मोडीत काढत आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकली.

आपल्या अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीत नावारुपास आल्यानंतर २०१२ मध्ये विद्याने सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला काही वर्षे उलटल्यानंतर माध्यमांमध्ये आणि विविध कार्यक्रमांना तिला एका प्रश्नाचा वारंवार सामना करावा लागतो. तो प्रश्न म्हणजे विद्याच्या गरोदरपणाविषयीचा. नुकत्याच एका मुलाखतीतही तिला असाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आपण मातृत्त्वाविषयी सध्यातरी काहीच विचार केला नसल्याचे तिने स्पष्ट केले.

चाळीशीच्या घरात पोहोचणाऱ्या विद्याने यावेळी २० वर्षांच्या मुलीप्रमाणे स्वच्छंद जगण्याची इच्छाही व्यक्त केली. त्याशिवाय आपल्या आयुष्यात मुलांचे जितके महत्त्व असते, एका आईला ज्याप्रमाणे तिची मुलं प्रिय असतात त्याचप्रमाणे मला माझे चित्रपट प्रिय आहेत, तेच माझी मुलं आहेत असेही विद्या म्हणाली.

‘भन्साळींइतकी सहनशीलता माझ्यात नाही’

https://www.instagram.com/p/BdUp3yMH2T4/

गरोदरपणाविषयी विद्याने याहीआधी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. रेल्वेप्रवासादरम्यान आपण बऱ्याचदा गर्भवती महिलेचे नाटक केल्याचे गुपित खुद्द विद्यानेच एका मुलाखतीत उघड केले होते. रेल्वेमध्ये जागा मिळण्यासाठी आपण गर्भवती असल्याचे नाटक केल्याचे तिने ‘अनुपम खेर अॅक्टिंग स्कूल’मध्ये संवाद साधताना सर्वांसमोर सांगितले होते.