बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. ऋषी कपूर गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. गुरुवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर बॉलिवूसह त्यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सर्वात आधी ट्विट करत शोक व्यक्त करणाऱ्यांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा समावेश होता. पण हे ट्विट अमिताभ बच्चन यांनी डिलीट केलं असून त्यांच्या ट्विटरला आता दिसत नाही आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट डिलीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती देताना म्हटलं होतं की, “ते गेले… ऋषी कपूर गेले….त्यांचं निधन झालं….मी उद्ध्वस्त झालो आहे”.

अमिताभ यांनी मात्र काही वेळातच हे ट्विट डिलीट केलं. अमिताभ यांनी हे ट्विट डिलीट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामागचं नेमकं कारण काय असावं याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान मरिन लाईन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीत ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी फक्त २० लोकांना परवानगी देण्यात आली होती. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर, पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, अरमान जैन, चित्रपट निर्माते आयान मुखर्जी आणि इतर लोक अंत्यसंस्काराला उपस्थित होते.लॉकडाउनमुळे त्यांच्या अनेक नातेवाईक, चाहत्यांना अंत्यदर्शनही घेता आलं नाही.