आयपीएल २०१८ मध्ये सुरुवातीपासूनच प्रत्येक सामना हा क्रीडारसिकांची उत्कंठा वाढवणारा ठरत आहे. अशा या क्रिकेटच्या महाकुंभात बुधवारी म्हणजेच ९ मे रोजी कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या संघाने यजमान कोलकात्याच्या संघाला हरवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली.

दरम्यान, मुंबईच्या संघाला मिळालेला हा विजय सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या ११ व्या हंगामात ज्या मुंबईच्या संघाचं अस्तित्व धोक्यात होतं, त्या संघाने गुणतालिकेत उसळी घेतल्यामुळे अनेकांनीच मोठ्या कलात्मक पद्धतीने या संघाचा विजय साजरा करण्यास सुरुवात केली. यात कलाविश्वही मागे राहिलं नाही. महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या संघाच्या विजयाला अनुसरुन एक ट्विट केल जे बरंच लक्षवेधी ठरलं.

‘Mumbai Indians vs KKR .. MI ‘102 not out’ vs KKR’, असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. मुख्य म्हणजे मुंबईचा संघ १०२ धावांनी जिंकल्यामुळे ही बाब हेरत बिग बींनी मोठ्या कलात्मकपणे, आपल्या चित्रपटाच्या नावाशी असलेलं साम्य लक्षात घेत हे ट्विट केलं. ज्याच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाचंही प्रमोशन केलं असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचं हे ट्विटही नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

वाचा : महेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…

केकेआर विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईच्या संघाली फलंदाजी आणि गोलंदाजी बरीच गाजली. इशान किशनने मुंबईसाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. अवघ्या २१ चेंडूंमध्ये त्याने ५ चौकार आणि ६ षटकार ठोकत कोलकात्याच्या गोलंदाजांच्या नकी नऊ आणले. तर, पांड्या बंधूंचीही या सामन्यात वाहवा झाली. खेळाडूंच्या या अफलातून खेळाच्या बळावर आता मुंबईचा संघ आयपीएलच्या या हंगामात कुठवर पल्ला गाठतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.