कलाविश्वात लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणाच्याही वरदहस्ताची गरज नसते हे अनेकजण सिद्ध करुन जातात. त्याचप्रमाणे या चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी प्रत्येक अभिनेत्याला मुख्य भूमिकेचीच गरज असते असे नाही. कारण, कधीकधी नकारात्मक भूमिकाही एखाद्या कलाकाराला बरीच लोकप्रियता मिळवून देते. अभिनेता आशुतोष राणाच्या बाबतीत असेच झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या नावाचा उल्लेख होताच अनेकांना, ‘संघर्ष’ चित्रपटात त्याने साकारलेली खलनायकी भूमिका लगेच आठवते.

मध्यप्रदेशमधील गाडरवाडा येथे जन्मलेला आशुतोष राणा याने आपल्या आजी- आजोबांच्या सांगण्यावरुनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. गावात होणाऱ्या रामलीलामध्ये तो नेहमीच रावणाची भूमिका साकारायचा. रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारण्यापासून ते अगदी चित्रपटसृष्टीत खलनायकी भूमिकांमध्ये जीव ओतणारा अभिनेता म्हणून राणा ओळखले जातो.

दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्याने अभिनयाचे रितसर शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत आल्यावर त्याने अभिनेता म्हणून आपली वाटचाल करण्यास सुरुवात केली. ‘स्वाभिमान’ मालिकेपासून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. आशुतोष राणाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती म्हणजे १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुश्मन’ या चित्रपटामुळे. या चित्रपटासाठी त्याला ‘फिल्मफेअर’ आणि ‘स्क्रीन वीकली’चा सर्वोत्कृष्ट खलनायकचा पुरस्कार मिळाला होता.

वाचा : शाहरुखने दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास का दिला नकार?

हिंदी सोबतच विविधभाषी चित्रपटांमध्येही त्याने उल्लेखनीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अभिनयाचा भक्कम पाया असणाऱ्या आशुतोषला वाचनाचीही फार आवड आहे. विविध प्रकारचे साहित्य वाचण्याकडे त्याचा कल असतो.