बॉलिवूडमध्ये दिवसागणिक नवनवीन कलाकारांचा प्रवेश होतच असतो. या परिस्थितीत आपला प्रेक्षकवर्ग जपण्याचं मोठं आव्हान सध्याच्या कलाकारांसमोर आहे. तगड्या प्रतिस्पर्धकांच्या या आव्हानांचा स्वीकार करत काही कलाकार त्यांचं अस्तित्व टिकवून आहेत. पण काहींच्या वाट्याला मात्र निराशा येतेय. अभिनेता रणबीर कपूरही सध्या अशाच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रणबीरच्या वाट्याला सतत अपयश येत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकले नाहीत. त्याच्या चित्रपटाच्या बाबतीत सांगावं तर तगडी स्टारकास्ट, मोठे दिग्दर्शक, नामांकित निर्मिती संस्था, तितक्याच उत्साहीपणे केलेली प्रसिद्धी असं सर्व काही नीट असताना नेमकी माशी कुठे शिंकते याचाच अंदाच येत नाही. आपल्या वाट्याला येणाऱ्या अपयशाचा खुद्द रणबीरनेही एका मुलाखतीत स्वीकार केला होता.

आता या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून रणबीरने त्याच्या आईची म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूर यांची मदत घेतल्याचं कळत आहे. नीतू यांनी रणबीरच्या वाट्याला येणाऱ्या अपयशाची समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषांची मदत घेतली आहे. ज्योतिषांनी रणबीरला काही रत्नांची अंगठी घालण्याचा सल्ला दिला आहे. या अंगठीच्या मदतीने त्याच्या करिअरच्या वाटेत येणार अडथळे दूर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे ‘मम्माज बॉय’ रणबीरनेसुद्धा आता हा सल्ला ऐकत त्या अंगठ्या घातल्याचं पाहायला मिळालं. नुकतंच मुंबई विमानतळावर त्याच्या हातात ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार सांगण्यात आलेल्या अंगठ्या पाहायला मिळाल्या. तेव्हा आता तरी ‘सावरिया’ रणबीरच्या चित्रपटांना यश मिळेल अशी चाहत्यांची आशा आहे.

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात

सततच्या अपयशाने भलेभले खचून जातात. रणबीरही याला अपवाद नाही. याविषयी त्याने एका मुलाखतीत खुलासाही केला होत. ‘मी त्या प्रसंगी खूपच हतबल झालो होतो. सततच्या अपयशाला कशा प्रकारे सामोरं जायचं हेच मला कळत नव्हतं. चित्रपट निवडण्यात माझी चुक होत होती का? असा एकच प्रश्न मी स्वत:ला वारंवार विचारत होतो. ती एक प्रकारची द्विधा मनःस्थिती होती’, असं तो मुलाखतीत म्हणाला होता.