एकीकडे नवोदित अभिनेते चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवत असतानाच रणबीर कपूर मात्र यशापासून काहीसा दूर गेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाहीये. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता अनेकांनीच चॉकलेट बॉय रणबीरच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पण, पापा ऋषी कपूर मात्र आपल्या मुलाचीच बाजू घेत असून, त्यांनी थेट अनुराग बासूलाच खडसावलं आहे.

‘मिड- डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऋषी यांनी अनुरागच्या बेजबाबदार वागण्यावर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांनी संगीत दिग्दर्शक प्रितमलाही चित्रपटाच्या अपयशाबद्दल दोष दिला आहे. ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापर्यंत बराच बेळ दवडला गेला ही बाब सर्वच जाणतात. याच मुद्द्याला अधोरेखित करत पापा ऋषी म्हणाले, ‘बुधवारपर्यंत अनुराग चित्रपटाचं मिक्सिंग करत होता. तुम्ही याचा विचार तरी करु शकता का? प्रितमनेही जवळपास आठवडाभरापूर्वीच चित्रपटाला संगीत दिलं. याविषयी काय म्हणाल? ते चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कोणालाही दाखवत नाहीत. असे वागतात जणूकाही ते अणुबॉम्बच तयार करतायेत. पण, आता त्यांना हे कोण सांगणार? मला त्याच्या (अनुराग बासू) बाबतीत एकता कपूरने घेतलेला निर्णय पटतोय. तिने त्याला चित्रपटापासून दूर ठेवलं हा चांगलाच निर्णय आहे. कारण, तो एक बेजबाबदार दिग्दर्शक आहे जो आपला चित्रपटही पूर्ण करु शकत नाही.’

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

‘जग्गा जासूस’ हा चित्रपट काही देशांमध्ये प्रदर्शित का होऊ शकला नाही असं विचारलं असता ऋषी यांनी पुन्हा अनुरागला दोष देण्यास सुरुवात केली. ‘हा चित्रपट सिंगापूरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही कारण, चित्रपट पाच दिवसांपूर्वीच संबंधित ठिकाणी पोहोचणं अपेक्षित होतं. हे सर्व बेजबाबदार आणि अस्वीकारार्ह वागणं आहे. यामध्ये बरीच गणितं आणि पैसा लागलेला असतो. कलात्मकतेभोवतीच सर्वकाही नसत’, असं म्हणत ऋषी कपूर यांनी वस्तुस्थिती सर्वासमोर मांडली.

वाचा : …म्हणून नेटिझन्सनी घेतली जुही, ऋषी यांची फिरकी

‘तुम्ही भले कितीही चांगले दिग्दर्शक असलात तरीही या बेजबाबदार वागण्यामुळे कोणीही तुमच्यासोबत काम करण्यासाठी तयार होणार नाही. गोविंदाची दृश्यंसुद्धा या चित्रपटातून वगळण्यात आली आहेत. जर दृश्य वगळायचीच होती तर, त्या अभिनेत्याला तुम्ही आधी निवडलातच का?’, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ‘पिक्चर शुरु’ या निर्मितीसंस्थेअंतर्गत साकारण्यात आलेल्या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीरही निर्मिती क्षेत्रात उतरला होता. तेव्हा आता आपल्या वडिलांनी अनुरागवर केलेले हे आरोप पाहता रणबीर यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.