सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी आवाज उठवत असून आपलं मत व्यक्त करत आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन चांगलंच चिघळलं. गुरुवारी विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारातील आंदोलनाची धग देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनऊ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या गोळीबारात लखनऊमध्ये एक तर मंगळूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. देशभरात पोलिसांनी हजारो आंदोलकांची धरपकड केली. यावेळी काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचंही पहायला मिळालं.

अभिनेता रितेश देशमुखनेही ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये आंदोलक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहेत. रितेशने यावर संताप व्यक्त कोणत्याही परिस्थितीत हे सहन केलं जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रितेशने ट्विट करताना लिहिलं आहे की, “कोणत्याही परिस्थितीत हे सहन केलं जाऊ शकत नाही. शांततेत चालणाऱ्या आंदोलनामुळे मिळणाऱ्या यशात हे आंदोलक हिंसाचार भडकवून आणि दगडफेक करत अडथळा आणत आहेत. यांना अटक केली पाहिजे”. रितेशने आपल्या ट्विटमधून हिंसाचार न करण्याचं आवाहन केलं आहे.