अभिवेता वरुण धवन आणि त्याची बालमैत्रीण नताशा दलाल यांचं नातं आता सर्वज्ञात आहे. नताशा आणि वरुण गेल्या बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्या दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याविषयीच्या गोष्टी लपवून ठेवल्या नाही. पण, खुलेपणाने वरुणने कधी या नात्यावर शिक्कामोर्तबही केल्याचं कमीच पाहायला मिळालं. सध्या बी- टाऊनमधील ही जोडी चर्चेत आली आहे ते म्हणजे त्यांच्या या सुरेख नात्याविषयी वरुणने केलेल्या उलगड्यामुळे आणि त्याच्या पहिल्या प्रेमामुळे.

‘फिल्मफेअर’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत वरुणने आपलं पहिलं प्रेम नेमकं कोण आहे, याचा उलगडा केला. नताशाव्यतिरिक्त आता त्याच्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं स्थान नेमकं कोणाचं आहे, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? डोक्याला जास्त ताण देण्याची गरजच नाही, कारण खुद्द वरुणनेच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘चित्रपट हेच माझं पहिलं प्रेम आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला याविषयी माहिती आहे. चित्रपटांनंतरच मग नताशा आणि इतर व्यक्तींना प्राधान्य देत असल्याचंही त्याने या मुलाखतीत स्पष्ट केलं.

नताशा आणि वरुणच्या नात्यात काही काळापूर्वी अडचणीही आल्या होत्या. पण, त्यावरही या जोडीने मात केली. नताशाने आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी प्रोत्साहित केल्याचं म्हणत तिच्यामुळेच ‘ऑक्टोबर’ आणि ‘बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांतील आव्हानात्मक भूमिका आपण साकारु शकलो हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं.

वाचा : सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?

आपल्या आयुष्यातील या खास नात्याविषयी सांगत तो म्हणाला, ‘फक्त मी एक अभिनेता आहे, म्हणून माझ्या आयुष्यात ती (नताशा) आहे, असं नाही. तर, तिचं असणंच मुळात खूप जास्त महत्त्वाचं आहे. आमचे खूप सुरेख बंध जुळले आहेत. बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्यामुळे हे नातं जास्तच महत्त्वाचं असून त्याचे बंध तितकेच घट्ट आहेत.’ यासोबतच वरुणने लग्नाच्या बहुप्रतिक्षित प्रश्नाचंही उत्तर दिलं. लग्न करण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हणत आता ते नेमकं कधी करणार हे मात्र ठाऊक नाही हेसुद्धा वरुणने सांगितलं.