तुम्हाला दिव्या भारतीचा हा सुनील शेट्टीसोबतचा 'बलवान' चित्रपट आठवतोय? विजय आनंदचा चेला दीपक आनंदने त्याचे दिग्दर्शन केले. सुनील शेट्टीच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. असणारच म्हणा, कारण त्याच्या अॅक्शनला यात खूप वाव होता. पण दिव्या भारती अगदी सहजपणे यात भाव खाऊन गेली. कारण तिच्या व्यक्तिमत्व व अभिनयात एक प्रकारचा आक्रमकपणा होता. तुम्हाला कदाचित माहित नसेल, 'मोहरा', 'कर्तव्य', 'लाडला' या चित्रपटात दिव्या भारती होती. या चित्रपटाची नावे वाचतानाच तुमच्या मनात प्रश्न असेल की या चित्रपटात दिव्या भारती कुठे होती? तुमचा प्रश्न अगदी बरोबरच आहे. पण मग काय झाले? बरोब्बर पंचवीस वर्षांपूर्वी ५ एप्रिल १९९३ चा दिवस उजाडला तोच एक अतिशय धक्कादायक दुःखद घटनेच्या बातमीने, 'दिव्या भारतीचे निधन.' आदल्या रात्रीच दिव्या विदेशातील आपले शूटिंग संपवून मुंबईत परतली आणि साजिद नडियादवाला याच्या घरच्या खिडकीत गप्पा मारत असतानाच खाली पडून तिचे निधन झाले अशी ती बातमी होती. तो अपघात की आत्महत्या (की आणखीन काही) याभोवती वादाची चर्चा रंगली.. दिव्या भारती विलक्षण वेगाने हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसवत होती, प्रचंड लोकप्रिय होत होती त्याच वेगाने तिचा दुर्दैवी अंतही झाला हे वास्तव स्वीकारणे अवघड होते. ती वागण्या, बोलण्यात, विचारात एकदमच बेधडक आहे याचाही अनुभव घेतला होताच. गोरेगावच्या स्वाती स्टुडिओत 'बलवान' (नायक सुनील शेट्टी), वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओत 'दिल ही तो है' (जॅकी श्रॉफ दुहेरी भूमिकेत) या चित्रपटांच्या सेटवरची दिव्याची भेट सहजी न विसरता येणारी. त्या काळात हे स्टार दिवसभरात एकच मुलाखत देत. पण पूर्ण फोकस ठेवून भारी देत. म्हणूनच तर आपलाही कस लागे. आणि 'पानभर' मुलाखत मिळे. लोकसत्ताच्या 'रंगतरंग' पुरवणीसाठी पूर्ण पान तिची चौफेर बोलंदाजीची मुलाखत घेतली होती. विशेष म्हणजे, तिची आई महाराष्ट्रीय असल्याने दिव्या 'मराठी मुलगी' आणि मराठी खूप छान बोले. दिव्या आघाडीच्या जवळपास सर्वच तारकांना मागे टाकून पुढे जाईल असे वाटत असतानाच तिच्या आयुष्याचा खेळच संपला. असा क्रियाशील कलाकार ऐन तारुण्यात निधन पावताच सर्वात पहिला प्रश्न, दिव्याच्या सेटवरील चित्रपटांचे काय? ते कसे पूर्ण करणार? यात किती कोटींचा फटका? वगैरे वगैरे. दिव्याची भूमिका असणारा जे. पी. दत्ता दिग्दर्शित 'क्षत्रिय' २६ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मोजून दहाव्या दिवशी ही ट्रॅजेडी झाली. तलत जानी दिग्दर्शित 'रंग'चे कमल सदनाहसोबतचे एक गाणे वगळता चित्रपट पूर्ण होता. एक डमी अभिनेत्रीला घेऊन हे गाणे चित्रीत करण्यात आले. पण. राज कंवर दिग्दर्शित 'लाडला' (अनिल कपूर) व 'कर्तव्य' (संजय कपूर) आणि राजीव रॉय दिग्दर्शित 'मोहरा' (अक्षयकुमार) या चित्रपटांचे काही प्रमाणात चित्रीकरण झाले होते. 'कर्तव्य'साठी तर फिल्मालय स्टुडिओत मोठा सेटही लागला होता. दिव्या भारतीच्या निधनाचा धक्का पचवून तिच्या जागी कोणाला तरी निवडून पुन्हा नव्याने सुरुवात करणे गरजेचे होते. व्यावसायिक जगात असे निर्णय घ्यावेच लागतात. त्यानुसार काही दिवसातच श्रीदेवी (लाडला), जुही चावला (कर्तव्य) आणि रविना टंडन (मोहरा) अशी निवड झाली. दिव्या भारती म्हणताच 'दीवाना', 'शोला और शबनम', 'दिल आशना है' 'विश्वात्मा' या चित्रपटांबरोबरच 'मोहरा', 'कर्तव्य', 'लाडला' यांचीही नावे घेता आली असती. दिलीप ठाकूर