बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी कपल्समध्ये दुरावा येण्याचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळालं. अशाच काही जोड्यांमधील बहुचर्चित कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ. १४ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या अनुराग बासूच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून रणबीर- कररिना पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत आहेत. अवघ्या काही दिवसांनीच प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं सध्या प्रमोशन सुरु आहे. विविध वाहिन्या, रेडिओ स्टेशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येत आहे.

रणबीर- कॅटच्या ब्रेकअपमुळे या चित्रपटाचं रिलीज होणं लांबणीवर गेल्याचं म्हटलं जात होतं. पण, खुद्द अनुराग बासूननेच हे स्पष्ट केलंय की, बी- टाऊनच्या या कपलच्या ब्रेकअपचा चित्रपटावर काहीच परिणाम झाला नाहीये. सध्याच्या घडीला ‘जग्गा जासूस’मधील गाणी एकीकडे अनेकांचं लक्ष वेधत असतानाच या चित्रपटाच्या निमित्ताने का असेना पण, रणबीरसोबतच्या नात्यात कतरिना पुन्हा एकदा स्थिरावल्याचं म्हटलं जात होतं. पण, त्यांच्यातील मतभेद आजही कायम आहेत हे एका मुलाखतीत नुकतच पाहायला मिळालं.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

प्रमोशनच्या निमित्ताने एका वाहिनीला चित्रपटातील आपल्या पात्राविषयी कतरिना माहिती देत होती, या चित्रपटातील रणबीर साकारत असलेल्या ‘जग्गा’सोबत आपलं कशा प्रकारे भावनिक नातं तयार झालं आहे हे सांगत असतानाच रणबीरने मध्येच त्याचं मत मांडण्यास सुरुवात केली. ‘कतरिना मी साकारत असलेल्या पात्राला लहान मुलाप्रमाणे वागवते जसं की त्याला काहीच कळत नाही’, असं तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर कतरिना म्हणाली, ‘खऱ्या आयुष्यात हा मला लहान मुलांप्रमाणे वागवतो जसं की मला काहीच माहीत नाही. तो मला बोलणंच पूर्ण करु देत नाही.’

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

त्यानंतर कतरिनाच्या पात्राविषयी सांगत रणबीरने एका नव्या विषयाला तोंड फोडलं. ‘तिचं पात्र आणि अडचणी सोबतच असतात. हे म्हणजे असं झालं, ती जिथे अडचणी तिथे’, असं तो म्हणाला. त्यावर, ‘हे मी सुद्धा बोलू शकते’ असं प्रत्युत्तर कॅटने दिल्याचं पाहायला मिळालं. ‘मी इथे बसलेली असताना तू माझ्या पात्राविषयी कसं बोलू शकतोस’, असं म्हणत तिने रणबीरला सौम्य शब्दांत एक प्रकारची ताकिदच दिली. या मुलाखतीदरम्यान बॉलिवूडच्या या सुपक्यूट कपलमध्ये बरेच खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे रणबीरच्या वक्तव्यांनतर कतरिनाचा चेहरा बरंच काही सांगून गेला. त्यामुळे या दोघांमधील केमिस्ट्री आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.