एकीकडे करोनाच्या महामारीशी सामना सुरू असताना आलेला ‘तौक्ते’ चक्रीवादळ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. आधीच करोनाचं संकट थैमान घालत असताना ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे अनेक शहरांची भयावह स्थिती झाली आहे. अनेक शहरांतील पडझडीचे फोटोज आणि व्हिडीओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटीपर्यंत या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. या चक्रीवादळात अनेक सेलिब्रिटींच्या घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यात बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या घराचं मोठं नुसकान झालंय. माध्यमाशी बोलताना तिने स्वतः ही माहिती दिली आहे.

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संपूर्ण व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. माध्यमाशी बोलताना तिने तिच्या घराचं कशा पद्धतीने नुकसान झालंय हे सांगताना दिसतेय. यात ती म्हणाली, “माझ्या घराचं छत कोसळलंय, टेरेस नाही…माझ्या घरातील पूर्ण बाल्कनीला छत बनवलं होतं…मी खूप टेन्शनमध्ये आहे…खूप दुःखी झालेय मी…पुर्ण दिवस माझ्या घराच्या छतावरून पाणी गळत होतं आणि मी बादली भरून भरून पाणी बाहेर काढत होते…म्हणून संपूर्ण दिवस मी घरबाहेर पडू शकले नाही, मी खूप नाराज झालेय…”.

यावेळी मुंबईमध्ये सतत बदलत असलेले हवामान आणि त्याचा जनजीवनावर कसा परिणाम होत आहे यावर देखील प्रतिक्रिया दिली. राखी सावतंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. राखी सावंत व्यतिरिक्त इतर सेलिब्रिटींना देखील याचा फटका बसला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ऑफिसमध्ये पाणी शिरलं होते. टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या शुटिंग सेटचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. तसंच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नवीन घराचे देखील नुकसान झाले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.