‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माने कलाविश्वामध्ये एका पाठोपाठ एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलिवूडमधील प्रत्येक चित्रपटाने अनुष्काला यश आणि प्रसिद्धी दिली. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अनुष्काने कलाविश्वापासून फारकत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अनुष्काने शाहरुख खानसोबत ‘झीरो’ हा अखेरचा चित्रपट केला होता. त्यानंतर ती कलाविश्वामध्ये फारशी झळकलेली नाही. मात्र आता अनुष्काने या मागचं खरं कारण सांगितलं आहे.

अनुष्काने काही दिवसापूर्वी फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये बोलताना तिने सध्या कोणताही चित्रपट साईन न केल्याचं सांगितलं. सोबतच असं करण्यामागचं कारणही स्पष्ट केलं.

‘झीरोनंतर थोडासा ब्रेक घ्यावा अशी माझी इच्छा होती. लग्न झाल्यापासून मी सतत काम करत होते. एका मागून एक चित्रपट सुरुच होते. लग्नानंतर पहिले ‘सुई-धागा’ मग ‘झीरो’ असे चित्रपट केले. हे चित्रपट करत असताना मला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी विराटला भेटायचे. त्यामुळे मला सतत जाणवत होतं की मी फक्त आणि फक्त कामच करत आहे. त्यामुळे मला दोन महिने सुट्टी हवी होती. मी माझ्या टीमला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मला कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायची नाहीये’. असं अनुष्काने सांगितलं.

दरम्यान, अनुष्काने २०१७ मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केलं. लग्नानंतर अनुष्काने सलग चार चित्रपटांमध्ये काम केलं. २०१८ मध्ये तिने ‘परी’, ‘सुई-धागा’, ‘संजू’ आणि ‘झीरो’ हे चित्रपट केलं. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. त्यामुळे तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.