बॉलिवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचं निधन झालं आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. जयपूर येथे राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे रजत मुखर्जी हे त्यांच्या गावी जयपूर येथे गेले होते. परंतु, या काळात मूत्रपिंडासंबंधीत तक्रारी जाणवू लागल्यामुळे त्यांना एप्रिलमध्येच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यानंतर मे महिन्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु, अखेर १८ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर मनोज वाजपेयी, हंसल मेहता आणि अनुभव सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘प्यार तूने क्या किया’, ‘रोड’, ‘लव इन नेपाल’, ‘उम्मीद’ या सारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.