बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. 'केसरी' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या तो या चित्रपटाला जास्तीत जास्त वेळ देत असून, चित्रपटासाठी त्याने खासगी आयुष्यातही काही गोष्टींचा त्याग केल्याचं पाहायला मिळालं. 'केसरी'च्या वाटेत उभ्या राहिलेल्या अडचणींवर अक्षय मात करण्याचा प्रयत्न करत असला तरीही या अडचणी मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सातारा येथे केसरीच्या सेटवर आग लागली होती. ज्यामध्ये जिवीत हानी झाली नसली तरीही सेटचं बरंच नुकसान झालं. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार चित्रपटाच्या सेटवर युद्धाच्या दृश्याचं चित्रीकरण सुरु होतं. ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर फटाके आणण्यात आले होते. त्याचवेळी चित्रीकरण सुरु असताना मोठा आवाज झाला आणि ही आग लागली. या दृश्याच्या चित्रीकरणाच्या काही वेळ आधीच अक्षय त्याच्या भागाचं चित्रीकरण करुन निघून गेला होता. दरम्यान, सेटवरील आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे सेट पुन्हा एकदा उभा करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार असून, कारण मुळातच आणखी दहा दिवसांचं चित्रीकरणही पूर्ण होणं अपेक्षित आहे. या साऱ्यामध्ये १८ कोटी रुपयांचा फटका खिलाडी कुमारला बसला असल्याचं कळत आहे. वाचा : VIDEO: पहिल्या प्रेमाचा उल्लेख करताना धोनी मध्येच थांबला…म्हणाला बायकोला काहीही सांगू नका चित्रपटाच्या सेटवर लागलेल्या आगीची जबाबदारी विमा कंपनीने घेण्यास नाकारलं असून, हे सर्व क्रू मेंबर्सच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचं कारण पुढे केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट होत आहे. तेव्हा आता याप्रकरणी विमा कंपनीच्या पुढील निर्णयाकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे असंच म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला 'केसरी'चा संपूर्ण सेट पुन्हा उभा होईपर्यंत स्पिती येथील लाहौल भागात चित्रीकरण सुरु करण्यात येणार असून, पुढील वीस दिवस तेथेच 'केसरी'चं चित्रीकरण होणार असल्याचं कळत आहे. त्यानंतर महाराष्ट्रात या चित्रपटाचा उरलेला भाग चित्रीत करण्यात येणार आहे. ऐतिहासिक घटनेवर प्रकाशझोत टाकत ‘केसरी’ साकारला जाणार आहे. १८९७ मध्ये लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धातील ३६व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. २२ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.