‘ए वतन’ आणि ‘दिलबरो’ या गाण्यांमागोमाग आता ‘राजी’ या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आलिया भट्ट, विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं ‘अगर दिल राजी है’ हे शीर्षक गीत बऱ्याच गोष्टी सांगून जात आहे. देशभक्ती, हेरगिरी आणि या साऱ्यामध्ये येणारी प्रेमाची आणि आपुलकीची भावना या सर्व गोष्टींचं सुरेख चित्रण या गाण्यात केल्याचं पाहायला मिळत आहे.

‘सहमत’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आलिया भट्ट या गाण्यातूनही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. एक हेर म्हणून परदेशात वावरत असताना तिच्या मनात असणारी भीती, त्यावरही तिचा आत्मविश्वास आणि देशभक्ती या सर्व भावना आलियाने तिच्या अभिनयातून प्रभावीपणे सादर केल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवत आहे.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

गुलजार यांनी लिहिलेलं हे गाणं शंकर- एहसान- लॉय या संगीतकार त्रिकुटाने संगीतबद्ध केलं आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं सध्या सर्वांच्याच काळजाला भिडत असून चित्रपटाला सारांश रुपात सर्वांसमोर मांडत आहे.
‘राजी’ चित्रपटामध्ये आलिया आणि विकी कौशल मुख्य भुमिकेत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचं कथानक १९७१च्या पार्श्वभूमीचे असून आलिया यात एका महिला गुप्तहेराची भूमिका पार पाडणार आहे. हा चित्रपट ११ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.