आतापर्यंत ए.आर.रेहमान यांनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांना आजवर अनेक मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. इतकंच काय तर त्यांनी ऑस्कर पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे. परंतु सध्या ऑए.आर.रेहमान चर्चेत आले आहेत. आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे, असा आरोप रेहमान यांनी केला होता. तसंच आपल्याविरोधात अशा उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे चित्रपटसृष्टीत कोणीही आपल्याला काम देत नाही, असा दावा त्यांनी केला होता. परंतु त्यांच्या या ट्विट नंतर अनेकांनी यात उडी घेतली होती. वाढलेला वाद पाहता रेहमान यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.

“गेलेला पैसा परत मिळू शकतो. गेलेलं फेमही परत मिळू शकतं. परंतु आपल्या आयुष्यातील वाया गेलेली वेळ ही पुन्हा मिळत नाही. शांतता. यातून आपण बाहेर पडू. आपल्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत,” असं म्हणत ए.आर.रेहमान यांनी या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ट्विटला रेहमान यांनी रिट्विट करत उत्तर दिलं आहे.


काय म्हणाले होते रेहमान?

“मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. मुकेश छाब्रा हे माझ्याकडे आले होते आणि मी दोन दिवसांमध्ये त्यांना गाणी तयार करून दिली,” असं ते म्हणाले होते.

“छाब्रा यांनी मला सांगितलं की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असं म्हटलं. तसंच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या,” असंही रेहमान यांनी यावर बोलताना सांगितलं.” त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजलं की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत,” असंही त्यांनी म्हटलं होतं. चित्रपटसृष्टीत काही लोक असेही ज्यांना वाटतं की मी त्यांच्यासोबत काम करावं आणि अशीही काही लोकं आहेत ज्यांना वाटतं की मला काम मिळू नये. मी नशीबावर विश्वास ठेवतो आणि तुमच्याकडे सर्वकाही देवाकडूनच येत असल्याचंही ते म्हणाले होते.